चोखोबांचा काळ

संजय सोनवणी

इतिहासाचा भाग असलेल्या एखाद्या व्यक्तित्वाला समजून घेताना त्याचा काळ समजून घ्यावाच लागतो. चोखोबांच्या काळातली राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थिती कशी होती, यावर टाकलेला हा प्रकाश.

भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथककथा, कालविपर्यास आणि त्रोटक स्वरूपाचा आहे. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुणदोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणं स्वाभाविकपणेच कठीण जाते.

संत चोखामेळा ज्या काळात झाले तो काळ आपण तपासून पाहुयात. चोखोबांना आणि त्यांच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता. याच काळात संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं तसंच गोरोबां-सावतांसारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चौदावे शतक हा या संतांचा काळ होय. या संतांनी पंढरीच्या, अवैदिक परंपरेतील आणि तशा अप्रसिद्ध देवतेला समतेचं आराध्य म्हणून स्वीकारलं. तेराव्या- चौदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी? अशा कोणत्या प्रेरणा महाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या की ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली?

चोखामेळा आणि त्यांचा परिवार ज्या जातिघटकातून संतत्वाला पोहोचला त्याचा विचार करता तत्कालीन समाजस्थिती नेमकी काय होती याबाबत कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. त्याच निमित्तानं महाराष्ट्रात अस्पृश्यतेच्या मानवताशून्य संकल्पनेचं गारूड समाजाला नेमकं कधीपासून ग्रासू लागलं, नेमक्या काही विशिष्ट जातीच अस्पृश्य का ठरवल्या गेल्या याचाही धांडोळा घेणं आवश्यक बनून जातं.

देवगिरीच्या यादवांची सत्ता इसवी सन ८५० मध्येच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. ही सत्ता १३१७ साली शेवटचे आचके घेत संपुष्टात आली. त्यानंतर इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर कायम झाली. म्हणजेच यादवांच्या उतरणीच्या काळात संतांचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. खरं पाहिलं तर १२९६ सालीच अल्लाउद्दीन खिल्जीनं देवगिरीचा पाडाव केला होता. तात्पुरत्या स्वरूपात रामचंद्र यादवांची पुनर्स्थापना झाली असली तरी खंडणी न भरल्यानं मलिक काफरनं १३०७ साली पुन्हा आक्रमण केलं होतं. १३१७मध्ये खिल्जीनं तेव्हाचा शासक तिसर्याू सिंघणला ठार मारून देवगिरीचं राज्य त्याच्या साम्राज्याला जोडून घेतलं. ही उलथापालथ आणि रक्तपात महाराष्ट्रानं अनेक शतकं पाहिलेलाही नव्हता. यामुळे जनजीवन विस्कळीत होणं आणि काहीतरी प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक समजायला हवं. पण तसं झाल्याचं चित्र दिसून येत नाही.

ही राजकीय अंदाधुंद चालू असतानाच संतांचा उदय झाला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. रामचंद्र यादवांच्या काळातच नरेंद्र कवीचं रुक्मिणी स्वयंवर आणि नागदेव चरित, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले गेले अथवा तेव्हा लेखन चालूच होतं. नामदेव ते चोखामेळा हे बहुजनी संत याच काळात बहराला येत होते. खरंतर त्यांच्या काळातील ही राजकीय उलथापालथ सामान्य नव्हती. जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर अव्याहत राज्य करणार्याो राजवंशाचा उच्छेद व्हावा आणि त्याचे कसलेही प्रतिबिंब नामदेव ते चोखोबांच्या एकाही लिखाणात पडू नये हे विस्मयकारक आहे. केंद्रीय राजकीय व्यवस्था आणि सामान्य नागरिकांत त्या काळात फारसा संबंध नसे, हे खरं आहे. खेड्यांतील प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवले जात. गावचा पाटील सोडला तर इतरांचा राजसत्तेशी काही संबंध येत नसे. हे जरी खरं असलं तरी परकीय आक्रमणं होतात, भीषण युद्धं होतात आणि प्रदीर्घ काळ राज्य करणारी सत्ता उद्ध्वस्त होते, पण त्याचे पडसाद तत्कालीन आणि नंतरच्याही संतांच्या अभंगात पडू नयेत हे मात्र विलक्षणच होय!

परंतु विषय पंढरीचा आणि श्रीविठ्ठलाचा असल्यानं यादवांची अल्प का होईना चर्चा अत्यावश्यकच आहे. पंढरीच्या श्री विठ्ठलाची मूर्ती चंद्रभागेतिरी पूर्वी उघड्यावर होती. बाराव्या शतकात यादवांच्या विठ्ठलदेव नायक नामक पंढरपूरच्या सामंतानं यादवांच्या अनुमतीअन विठ्ठलाचं पहिलं मंदिर बांधलं. तत्पूर्वी विठ्ठलाचे भक्तजन हे बव्हंशी धनगर, कुरुब, कोळी होते हे रा. चिं. ढेरे यांनी साधार सिद्ध करून दाखवलं आहे. तसंच माणिकराव धनपलवार यांनी विठ्ठलाचं मूळ रूप शैव होतं हेही सिद्ध करून दाखवलं आहे. एका दैवताच्या मूळ स्वरूपात झालेले हे बदल यादवकाळातच झाले आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे. यामागील कारणांचाही शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.

तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात अनेक धार्मिक चळवळी झालेल्या दिसतात. एकीकडे समतेचा पुरस्कार करणार्याल नाथ, वीरशैव आणि महानुभाव पंथांनी महाराष्ट्र भूमी व्यापली असतानाच वैदिक धर्माचा जोरही राजाश्रयानं वाढत असल्याचं दिसतं. मध्यंतरी लुप्तप्राय होऊ पाहणार्याए वैदिक धर्मानं महाराष्ट्रात उचल खाल्लेली दिसते. याचं कारण म्हणजे मनुस्मृतीच्या धर्तीवर देवल स्मृती महाराष्ट्रात यादवकाळातच लिहिली गेली. यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री पंताचा जवळपास साडेचार हजार व्रतं सांगणारा ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथही याच राजवटीत आकाराला आला. पूर्वी व्रतं नव्हती असं नाही, पण त्यांची संख्या अत्यल्प अशीच होती. उदा. शंकरभट्टाच्या ‘व्रतार्क’मध्ये फक्त ११३ व्रतं दिली गेली आहेत. शैव विठ्ठलाचं वैदिक वैष्णवीकरणही याच काळात झालं. प्रशासनातील वैदिकांचं प्रमाणही याच कालात क्रमश: वाढत गेल्याचं डॉ. मालती महाजन म्हणतात. शूद्रांवरील बंधनं या साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात वाढतच गेली आहेत.

खरं तर यादव हे यदुवंशी गोपालक समाजातून आलेले राज्यकर्ते. वैदिक धर्मानुसार शूद्रच. यादव वंशाच्या कारकीर्दीत यादवांनी कसलेही यज्ञ केल्याची नोंद नाही, कारण त्यांना अवैदिक असल्यानं तो अधिकारच नव्हता. यादव काळात शैव मंदिरांची संख्या सर्वाधिक असून, बव्हंशी लोक शैवप्रधान धर्माचं अनुसरण करत असत. पण याच काळात देवल स्मृतीच्या माध्यमातून वर्णव्यवस्थेचं आणि जन्माधारित उच्चनीचतेचं स्तोम महाराष्ट्रात पसरलेलं दिसतं. बाकी सर्व स्मृत्यांची रचना उत्तरेत झाली असली तरी या स्मृतीची रचना महाराष्ट्रात आणि यादवकाळातच दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या स्मृतीत वर्णाश्रमधर्म, शुद्धी, प्रायश्चित्तं आणि धर्मांतरितांना परत धर्मात घ्यायची सोय होती, असं मानलं जातं. त्यामुळे या कालात धर्मांतरांचं प्रमाण वाढलं असावं असा तर्क बांधता येतो. राज्यकर्त्यांची साथ असल्याखेरीज धर्मविषयक मतांचा बोलबाला सहजी वाढत नाही. त्यामुळे यादव घराण्यानंही त्यांना प्रोत्साहन दिलं असेल अशीही शक्यता आहे.

याच काळात वैदिक धर्माला प्रतिक्रिया म्हणून शैवांनीही वैचारिक आणि समतेची क्रांती पुन्हा सुरू केली. त्यात अग्रभागी होते नाथ, महानुभाव आणि वीरशैव पंथ. यात नाथपंथ सर्वात जुना आणि सर्वात आघाडीवरचा म्हणता येईल. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं मूळची नाथ संप्रदायाशीच निगडित होती. ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव हा शैव नाथपंथीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घालणारा ग्रंथ आहे. उपनयन नाकारलं गेल्याने वैदिक धर्मानुसारही ते शूद्रच होते. नाथ पंथ त्यांना अधिक आपलासा वाटला असल्यास त्यात काही आश्चर्य नाही.

अद्वैत शैव सिद्धांतातून प्रगत पावलेला नाथ संप्रदाय नक्की कधी स्थापन झाला याची ऐतिहासिक नोंद मिळत नसली तरी दहाव्या-अकराव्या शतकात गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असावी, असा मतप्रवाह आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात निवृत्तीनाथांनी वयाच्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असं सांप्रदायिक वाड्मयानुसार दिसतं. विशेष म्हणजे चारही भावंडांची नांवं ही नाथ संप्रदायाच्या परंपरेतील आहेत. इतकेच नव्हे तर ‘समाधी’ या नाथ संप्रदायातील प्रथेच्या वापर चारही भावंडांनी केला.

नाथ संप्रदाय हा समानतेचा पंथ. या पंथानं वैदिक उत्थानासमयीच उचल खावी याचा अर्थ वैदिक विषमतेचं गारूड समाजाला ग्रासू लागलं होतं. यामुळेच की काय बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कर्नाटकात वीरशैव म्हणजेच लिंगायत पंथाची स्थापना केली. वेद आणि वैदिक कर्मकांड नाकारत समतेची अवाढव्य चळवळ त्यांनी उभी केली. महाराष्ट्र निकटचा असल्यानं, विशेषत: सोलापूर आणि नजीकच्या भागात हा पंथ पसरुन चोखोबांच्या काळापर्यंत सुस्थापित झाल्याचं दिसतं. चक्रधरांचा महानुभाव पंथ १२६७मध्ये कृष्णाला आराध्य मानत समतेचाच संदेश देणारा पंथ म्हणून स्थापन झाला. चक्रधर जरी गुर्जर देशातून आले असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश ही प्रामुख्यानं राहिली. याही पंथानं समतेच्या सिद्धांताला चालना दिली.

एकंदरीत महाराष्ट्रात वैदिक विरुद्ध अवैदिक हा धर्मसंस्कृतीसंघर्ष यादवकाळात प्रकर्षानं पुढं आलेला दिसतो. समतेचं आकर्षण हा मानवी समाजाचा मूळ गाभा आहे. वैदिक वर्णव्यवस्था मात्र ती नाकारते त्यामुळं वैदिक प्राबल्य झुगारण्यासाठी वेदनिषेध केला जाणं स्वाभाविक होतं.

तेव्हा विठ्ठलभक्ती महाराष्ट्रात अल्प असली तरीही नवीन नव्हती. तसा हा अवैदिक देव. माणिकराव धनपलवारांच्या मते हे मूळचं शैव स्थान होतं. पुंडलिकाचं मंदिर हे प्रत्यक्षात शिवालय आणि त्यासमोर करकटी ठेवून उभा श्री विठ्ठल हे वास्तव पाहता हे मूळचं शिवस्थानच याबाबत शंका घेता येत नाही. विठ्ठलाची मूर्ती ही आधी उघड्यावरच होती आणि यादव काळात पहिलं मंदिर झालं हे आपण वर बघितलं. येथे आजवर विद्वानांच्या साक्षेपी नजरेतून सुटलेला महत्त्वाचा भाग असा की यादवकाळात एकीकडे अवैदिक शैव पंथांचा समतेचा बोलबाला चालू असताना एक दुर्लक्षित शैव स्थानाचं रूपांतर चक्क वैदिक वैष्णव स्थानात नेमकं का केलं गेलं असावं हा.

विठ्ठल हा विष्णूच्या सहस्रनामांत अथवा चोवीस अवतारांतही न सापडणारा देव. संतांनाही त्याचंच एक आगळं कुतूहल असल्याचं त्यांच्या अभंगांवरून जाणवतं. तरीही तो विष्णू अथवा कृष्ण या रूपात पुढे आणला गेला. असं असलं तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. ‘विष्णूसहित शिव…आणिला पंढरी’ असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केलं गेलं, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोखोबांनी ते स्वीकारलं आणि त्यालाच आपलं आराध्य बनवलं हे एक वास्तव आहे.

खरंतर हा लढा वैष्णव की शैव असा नसून वैदिक की अवैदिक असा होता. त्याच अनुषंगानं तत्कालीन सांस्कृतिक संघर्षाकडे पाहिले पाहिजे. विष्णू ही ऋग्वेदातील, अवघी साडेतीन सूक्त अर्पण केलेली देवता. तो ऋग्वेदात इंद्राचा दुय्यम मित्र (उपेंद्र) म्हणून पुढे येतो. ऋग्वेदात अवतार संकल्पना आहे. पण अवतार घेण्याचं कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णूकडे नव्हे, हे लक्षात घेतलं पाहिजे. विष्णू ही देवता गुप्तकाळात नवीन चरित्र बहाल करत पुढे आणली गेली. त्याला सागरशयनी आणि लक्ष्मीपती बनवण्यात आलं. ऋग्वेदात त्याला पत्नी असल्याचा उल्लेख नाही अथवा तो सागरशयनीही नाही. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला होता. गुप्त नाण्यांवर सर्वप्रथम लक्ष्मी आणि विष्णू अवतरतात. ऋग्वेदातील अवतार घेण्याचं कार्य आता विष्णूवर सोपवण्यात आलं. पुरातन काळातील महनीय व्यक्तित्वं म्हणजे राम, कृष्ण. विष्णूचे अवतार घोषित करत त्यांची चरित्रंही वैष्णव बनवण्यात आली. इतकी की गौतम बुद्धाला, जो वेदविरोधी होता, त्यालाही विष्णूचा अवतार ठरवण्यात आलं.

खरंतर मूर्तीपूजा ही संकल्पना मुळात वैदिक नाही. यज्ञांतील आहुतींद्वारे हवन करत इंद्रवरुणादी अमूर्त वैदिक देवतांना आवाहनं करत संतुष्ट करणं हे वैदिक कर्मकांड. परंतु बुद्धाच्या उदयापासूनच त्यानं हिंसात्मक यज्ञांना विरोध सुरू केल्यानं यज्ञ मावळू लागले होते. शिवाय ते खर्चिक, गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ (काही यज्ञ १२-१२ वर्ष चालत) बनल्यानं यजमान सापडण्याचीही मारामार होऊ लागली होती. त्यामुळं मूर्तीपूजेला शरण जाण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. पण तसं करताना त्यांनी अवैदिक देवता न निवडता विष्णू हीच वैदिक देवता निवडली. पांचरात्र या अवैदिक संप्रदायातील भक्तितत्त्व उचललं आणि वैष्णव पंथ जोमानं वाढवला जाऊ लागला. पण या पंथातील वैदिक वर्णव्यवस्थेची मूलतत्त्वं मात्र कायम ठेवण्यात आली.

महाराष्ट्रात समतेच्या शैव पंथांचा जागर सुरू असताना एक अप्रसिद्ध शैवस्थान वैष्णव स्थान म्हणून पुढं का आणलं गेलं याचं कारण वैदिक-अवैदिक संघर्षात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शैव पंथांना मात दिल्याखेरीज वैदिक महत्ता वाढणार नाही, ही या मागची व्यूहनीती होती. त्यामुळं विठ्ठलाला वैष्णव साज चढवण्यात आले. विठ्ठलाचा पूर्व दैवतेतिहास हा अत्यंत धूसर असल्यानं हे वैष्णव चरित्र चढवता येणं सोपंही होतं. तसं ते झालंही. आद्य संतांनी विठ्ठलाला विष्णू, कृष्ण याच रूपात पाहिलं असल्यानं हा चरित्रबदल स्वीकारलाही गेला होता, असं स्पष्ट दिसतं. मात्र चक्रधर जरी कृष्णोपासक असले तरी त्यांनी विठ्ठलाला कधीही कृष्णाचं रूप मान्य केलं नाही. उलट ते विठ्ठलाला गोचोर, भडखंभा अशा विशेषणांनी हिणावत असल्याचं दिसतं.

म्हणजे यादव काळातील ही जी धर्मविषयक उलथापालथ घडत होती तिचंच अनावर आकर्षण संतांना होतं, असं दिसून येतं. त्याचमुळे की काय अन्य राजकीय उलथापालथी, रक्तपात याबाबत ते उदासीन राहिले एवढाच तर्क काढता येईल. अर्थात सामाजिक, सांस्कृतिक उलथापालथी होत असताना त्याचे मानसिक परिणाम जनसमुदायावर होणं स्वाभाविक आहे.

विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्यानं दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारलं होतं ते कायम राहिलं. विठ्ठलाचं वर्णन करताना संतांच्या शब्दांत वेदतुल्य अशा शब्दकळा पाझरताना दिसतात. ‘वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही’ ते ‘वेदांचा अर्थ आम्हासही ठावा’ अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हणजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत, हे मान्य करताना दिसतात. ‘अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विटेवरी’, ‘ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती, तो हा रमापती पंढरिये’ असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळं आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा आणि त्यांचा परिवारही मान्य करताना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृश्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो. त्याविरुद्ध बंड करत नाही. वैष्णव संप्रदायच मूळात वैदिक असल्यानं असं झालं असं म्हणता येणार नाही काय?

येथे महत्त्वाचं पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे, शैव पंथ वेद मान्य करत नाहीत आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ, सिद्ध, दत्त आदी संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकंच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं ही नाथ संप्रदायातीलच होती. असं असतानाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे आपल्या सांस्कृतिक इतिहासातील एक कोडं आहे.
परंतु संतांच्या समतेच्या चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही, याची कारणं आपल्याला वैदिक तत्त्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील आणि व्यवहारातील जन्माधारित जातीनं आलेला हीनभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोखोबांना आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचं भाग्य लाभलं नाही. कारण ज्या मूलभूत तत्त्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचं तत्त्वज्ञानच जन्माधारित विषमतेचं होतं. आजही विठ्ठलाच्या पूजेत विषमतेचं आदिकारण मानलं गेलेलं पुरुषसूक्त म्हटलं जातं, यावरून मला काय म्हणायचं आहे, ते लक्षात यावं. समतेची चळवळ पायाच चुकीचा असल्यानं फसली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

अस्पृश्यता हा भारतातील एक मोठा कलंक आहे, याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. परंतु ती नेमकी सुरू कधी झाली आणि का याची कारणं मात्र अत्यंत वेगवेगळी दिली जातात. वैदिक धर्मग्रंथांत चांडाळ, श्वपच, धिग्वन अशा काही जाती अस्पृश्य मानल्या गेल्याचं दिसत असलं तरी महार या जातीचा कोठेही उल्लेख मिळत नाही. महार समाज हा मूळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचं रक्षण करणारा समाज. वेशीचं रक्षण करणं, चोरी झाली तर चोरांना पकडणं, जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, शेतीतील गावातील तंटे उद्भवले तर साक्ष देणं (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे सरदारांचे व्यक्तिगत अंगरक्षक म्हणून काम करणं इत्यादी अत्यंत महत्त्वाची कामं त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचं दिसतं. या कामांत कालौघात काही हिणकस कामांचा म्हणजे मृत जनावर ओढून नेणं, गावातील स्वच्छता राखणं यांचा समावेश झाला. असं असलं तरी महारांना अस्पृश्य का मानलं गेलं, याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरं ही अस्पृश्यता गावपातळीवरील काम करणार्यां बाबत पाळली जात होती का सर्वत्र, हा विचार केला तरी गोंधळाचं चित्र सामोरं येतं. उदाहरणार्थ सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसतं की सैन्यातील महारांबाबत अस्पृश्यता पाळली जात नव्हती. इतकंच नव्हे तर त्यांचं वेतन आणि इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमिनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचं पथक होतं. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचं दिसतं. आपल्याकडील स्थितिस्थापकता पाहिली तर चोख्याच्या काळातही थोड्याफार फरकानं अशीच स्थिती असावी, असा अंदाज बांधता येतो. म्हणजे महारांवरील अस्पृश्यता ही सार्वत्रिक होती काय, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येतं. असं असलं तरी गावकामगार महार अस्पृश्य मानला जात होता याचं निराकरण होत नाही.

महारांना जन्म-मृत्युच्या नोंदी ठेवणं, जमिनींच्या सीमा आखणं, सारा मुख्य ठाण्याला पोचवणं अशी कामं करावी लागत असल्यानं त्यांनी साक्षर असणं क्रमप्राप्त होतं. चोखा आणि त्याचा परिवार अभंग रचून लिहित होता ते त्यामुळेच असं म्हणायला प्रत्यवाय नाही. चोखा आणि त्याचा परिवार मात्र अस्पृश्य मानला गेला. संतत्वाला जाऊनही अस्पृश्याचा विटाळ तर गेला नाहीच पण गावगाड्याचा भारही गेला नाही. वेठ म्हणजे सरकारी कामं प्रजेकडून मोफत वा अत्यल्प मोबदल्यात करून घेणं. मंगळवेढ्याच्या वेशीचं काम वेठीवर करत असताना भिंत कोसळून चोखोबांना मरण आलं. विषमतेच्या काळोखातून विषमतेच्या काळोखात चोखोबा विलीन झाले. दुर्दैवानं वारकरी चळवळ त्या अंधारातून बाहेर पडली असं आजही म्हणता येणार नाही!

0 Shares
अमर अगाध अभंग त्याचे आता काय?