मानवतेचं गाणं

श्रीरंग गायकवाड

तेराव्या शतकात जेव्हा जगभरात कुठंही उपेक्षितांचा आवाज उमटत नव्हता, दलित मुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, त्या काळात महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपुरात संत चोखामेळ्याचं कुटुंब वंचितांच्या वेदनांना शब्दरूप देत होतं. मानवतेचं गाणं गात होतं. दुर्दैवानं आपल्याला त्यांचं मोठेपण कधीच कळलं नाही.

ऊस दरवर्षीच असा ओढ देतो. चैत्र, वैशाखापासूनच टंचाईच्या झळा लागायला सुरुवात होते. संपत आलेल्या चारा-वैरणीच्या वळईकडं बघत गाय, म्हैस हंबरत असते. आषाढी वारीला जाण्यापूर्वी त्यांच्या चार्या्ची बेगमी करावी म्हणून वडील परिसरातल्या शेतकर्यांाकडे जातात. त्यांचीही परिस्थिती तीच. ज्याला त्याला आपापली काळजी. अशा वेळी वरच्या मळ्यातले बाळनाना हमखास मदतीला येतात. अडाणी, भोळाभाबडा शेतकरी, पण पोटात माया. दोघांच्या गप्पा सुरू असताना एकदा बाळनाना बोलून जातात, बुवा आता आणखी नका पडू गबाळाचे भरी… वडील चमकतात. त्यावर बाळनाना हसून म्हणतात, अहो तुमच्याच भजनकीर्तनात ऐकलंय…

लहानपणीचा हा प्रसंग मला काही दिवसांपूर्वी संत सोयराबाईंचे अभंग वाचताना आठवला. आणिक नका पडू गबाळाचे भरी| म्हणतसे महारी चोखियाची॥ मी थरारूनच गेलो. प्रस्थापित साहित्यात आपल्याला कधीही न दिसलेलं दलित महिला संताचं अर्थात संत सोयराबाईंचं हे शब्दधन दूरवरच्या खेड्यातल्या एका अडाणी शेतकर्या्नं त्याच्या स्मृतीच्या कुठल्या कप्प्यात कसं जपून ठेवलं असेल? शिवाय वेळप्रसंगी ते चपखलपणानं वापरावं, याचं भान त्याला कुणी दिलं असेल?

सुमारे ७०० वर्षांपूर्वी गावकुसाबाहेरच्या अस्पृश्यांच्या वस्तीत राहणार्याी, नवर्याससोबत महारकीची, मोलमजुरीची मिळेल ती कामं करणार्या०, शिळा भाकरतुकडा खाऊन राबराब राबणार्यार, फाटकं लुगडं नेसून फाटका संसार ओढणार्या‍ या माऊलीनं कसे लिहिले असतील एवढे नितांतसुंदर, अर्थगर्भ अभंग?

सार्यां गावाला ‘जी जी’, ‘जोहार माय बाप’ म्हणणारा, त्यांची पडेल ती कामं करणारा, मेलेली गुरं ओढणारा, त्यातून सवड मिळेल तेव्हा पत्नीला लिहायला, वाचायला शिकवणारा, स्वत:च्या कर्तृत्वानं संतपदाला पोहोचलेला सोयराबाईंचा पती चोखामेळा. संत चोखोबा आणि सोयराबाई हे संत दांपत्य म्हणजे भारतीय समाजातील एक सांस्कृतिक चमत्कारच. ज्यांना अस्पृश्य म्हणून समाजानं अत्यंत हीन, अमानवी वागणूक दिली त्याच समाजाचं भलं चिंतणारे अभंग या उभयतांनी लिहिले. त्यांच्या जन्म-मृत्यूची नेमकी नोंद, नावा गावाचा वास्तव इतिहास मात्र अजूनही सापडत नाही. आणि तो कोण नोंदवून, जपून ठेवणार होतं? तरी हे उभयता टिकले. तब्बल सातशे वर्ष टिकले. ते केवळ त्यांच्या प्रतिभेवर, शब्दसामर्थ्यावर, अभंगावर! कुटुंबप्रमुख म्हणून चोखोबाच्या नावा गावाची, जन्म-मृत्यूची काही का होईना नोंद सापडते. सोयराबाईंची तर तीही नाही. चोखोबांची उपलब्ध माहिती अशी आहे,

जन्मतारीख : तेरावं शतक. वार, तारीख यांची नेमकी नोंद नाही. (प्रा. देविदास इथापे यांच्या मते- १४ जानेवारी १२६८, शके ११९०)
जन्मस्थळ : काहींच्या मते बुलडाण्यातील मेहुणपुरा, काहीच्या मते पंढरपूर तर काही संशोधक म्हणतात, मंगळवेढाच.
माता पिता : सावित्रीबाई सुदामा येसकर
कुटुंब : मुलगा- कर्ममेळा, बहीण- निर्मळा, मेहुणा- बंका
सखेसोबती : निवृत्तीनाथ, नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, गोरा कुंभार, जगमित्र नागा, सावतामाळी, नरहरी सोनार.
उपलब्ध अभंग : चोखामेळा- ३५८, सोयराबाई- ६२, कर्ममेळा- २७, बंका- ४१, निर्मळा- २४
देहावसान : मंगळवेढा येथे गावकुसू कोसळून त्याखाली मृत्यू. शके १२६०, गुरुवार, वैशाख वद्य पंचमी.

याव्यतिरिक्त चोखोबा कुटुंबाचा कायमस्वरूपी मुक्कामाचं ठिकाण, नातेवाईक, पोटापाण्याचा उद्योग याबद्दल ठोस माहिती मिळत नाही. त्याविषयी फारसं संशोधनही होताना दिसत नाही.

या कुटुंबाचे स्वत:चे आणि त्यांच्या समकालीन संतांचे अभंगच काय ते त्यांच्या चरित्राचं साधन. चोखोबाचं बुलडाण्यातील जन्मस्थळ मेहुणपुरा, मुक्कामस्थळ मंगळवेढा आणि कर्मस्थळ पंढरपूर या तीन ठिकाणी हे थोर संत कुटुंब आपलं ऐतिहासिक आयुष्य जगलं.

जन्मस्थळ मेहुणपुरा
बहुसंख्य विचारवंतांच्या मते ते मेहुणपुरा येथील आहेत. त्यांचे चरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या मते चोखोबा पंढरपूरचे आहेत. मेहुणपुरामध्ये चोखोबा कुटुंबाच्या स्मृतीखुणा पाहायला मिळतात. जन्मस्थळाबाबत वाद असला तरी या मेहुणपुरा गावाशी चोखोबा कुटुंबियांचं भावनिक नातं होतं. तिथं चोखोबांची बहीण निर्मळा आणि मेहुणे बंका राहत. सोयराबाई आणि निर्मळा या नणंद-भावजयीत फार जीवाभावाचं नातं होतं. सोयराबाई एका अभंगात म्हणतात, ‘झाली निर्मळेची भेटी| सोयरा पायी घाली मिठी’ या नणंद- भावजया एकमेकीला अगदी तेल, मीठ, पीठासह पुरवत असणार. एकमेकांच्या संसारातलं सुख-दु:ख देत घेत असणार हे त्यांच्या अभंगांमधूनच जाणवतं. कर्ममेळा यांच्या वेळी सोयराबाईंच्या पोटात दुखत असताना चोखोबा मदतीसाठी निर्मळेकडेच गेल्याचा उल्लेख आहे. चोखोबा निर्मळेला घेऊन लवकर येत नाही म्हणून देवच निर्मळेचं रूप घेऊन सोयराबाईंचं बाळंतपण करतो, अशी आख्यायिका प्रचलित आहे.

अर्थात संसारातलं सुख-दु:ख वाटून घेणार्याा या दोघी महिला संत अभंगांतून जे तत्त्वज्ञान सांगतात, ते जबरदस्त आहे. मध्ययुगीन काळात एवढं तगडं लिहिणार्यान या दुर्मीळ महिला संत आहेत. एकमेकांशिवाय दुसरं कुणीही नसल्यानं ही दोन्ही कुटुंबं अत्यंत गोळ्यामेळानं राहताना दिसतात. निर्मळा- सोयराबाईंचं जसं प्रेमाचं नातं आहे, तसंच चोखोबा आणि बंकांचं आहे. चोखोबांना मार्गदर्शक मानणारे बंका अभंगातून चोखोबांचं मोठं सुंदर वर्णन करतात.

चोखा चोखट निर्मळ| तया अंगी नाही मळ्॥
चोखा सुखाचा सागर| चोखा भक्तीचा आगर॥
चोखा प्रेमाची माउली| चोखा कृपेची साउली॥

आपल्या लेखणीतून बंका यांनी चोखोबांची अशी निर्मळ प्रतिमा उभी केली आहे. शिवाय चोखामेळा यांची आरती लिहून बंकामहाराजांनी चोखोबांना चिरंजीव करून ठेवलं आहे.

मुक्काम मंगळवेढा
मेहुणपुर्याळहून चोखोबा कुटुंब मंगळवेढ्याला कधी आणि का आलं, याविषयी काही उल्लेख वाचायला मिळत नाही. एक मात्र नक्की तत्कालीन समृद्धी, रोजगाराची सोय आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वातंत्र्य जपणार्याच या गावात राहणं चोखोबांना अधिक सोयीचं वाटलं असणार. चोखोबांचं हे उदरनिर्वाहाचं गाव असलं तरी या गावाला संतांच्या सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. वैदिक, जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, लिंगायत, महानुभव, सूफी असे सर्व धर्म, पंथ मंगळवेढ्यात आनंदानं नांदले. त्यांचा प्रभाव मंगळवेढा परिसरावर फार मोठा होता. यातील स्त्रीशूद्रांना अधिकार देणार्यार बसवेश्वरांच्या लिंगायत पंथांचं तर मंगळवेढा ठाणंच होतं. त्याचीच ऊर्जा चोखामेळा कुटुंबाला मुख्यत: सोयराबाई आणि निर्मळेला मिळाली. याशिवाय चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभंग वाचले तर या भिन्न पंथांच्या विचारांचं प्रतिबिंब त्यात पडलेलं दिसतं. या पंथांचे भाषेचे समृद्ध संस्कारही त्यांच्या अभंग रचनेवर पडलेले दिसतात. देवगिरीच्या यादवांच्या काळात मुस्लिम व्यापारी, राज्यकर्त्यांच्या निमित्तानं अनेक सूफी संतांचा मोठा वावर या परिसरात होता. त्यामुळंच चोखोबा, सोयराबाईंच्या अभंगात अरबी आणि फारसी शब्दांचा वापर वारंवार आढळतो. वरती उल्लेख केलेला

आणिक नका पडू गबाळाचे भरी| म्हणतसे महारी चोखियाची॥ यातील गबाळ (घैब या फारशी शब्दापासून- घैब-गाईब-गायब-गबाळ) या शब्दाचा अर्थ निरुपयोगी किंवा अव्यवस्थित तर ‘गैब’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘गुप्त गोष्टी जाणणारा’ असा आहे. चोखोबांच्या अभंगात फारसी शब्द खूपदा येतात. उदा.
मी विठोबारायाचा महार| हिशोब देतो तारोतार॥
लंबे बाकीचा कारभार| मज नफराचे शिरी||

विजापुरात स्थापन झालेल्या सुफी संतपीठाच्या कार्यक्षेत्रात हा परिसर येत होता, त्याचा हा परिणाम असावा. सर्व धर्म, पंथ सुखेनैव नांदतात अशी समन्वयाची भूमी म्हणजे मंगळवेढा. तिथं घडलेला संत चोखामेळा आणि त्यांचं कुटुंब म्हणजे ज्ञानोबामाऊली सांगतात त्याप्रमाणं जणू ‘कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव’… अर्थात तत्कालीन रुढींप्रमाणं चोखोबांना इथं अस्पृश्यतेचे तीव्र चटके बसले, हेही खरं.

कर्मस्थळ पंढरपूर
चोखोबांच्या मंगळवेढ्याहून पंढरपूर अवघ्या १४ मैलांवर. अनेक दिंड्या मंगळवेढ्याहूनच पंढरपूरला जातात. वेगवेगळ्या उपासनापद्धती पाहिलेल्या चोखोबांना नाचत गात पंढरीला निघालेल्या वारकर्यां विषयी विशेष आपलेपण वाटलं असावं. त्यांच्यासोबतच कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटात सुरू असलेला तो समतेचा सोहळा त्यांनी अनिमिष नेत्रांनी पाहिला. याच वाळवंटात वारकर्यां ची चळवळ उभारू पाहणार्याल संत नामदेवांशी चोखोबाची भेट झाली.
तिथं बुजलेल्या चोखोबांना नामदेवांनी जवळ घेतलं. अधिकारहीन जातींना अधिकार मिळवून देण्याचा चंग बांधलेल्या या संतनेत्यानं या दलित चोखोबाच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला आत्मविश्वास मिळवून दिला. त्यांच्यात गुरुशिष्याचं नातं तयार झालं. त्या नात्याबद्दल सांगताना चोखोबा म्हणतात,
चोखा म्हणे माझा नामदेव प्राण| घालीन लोटांगण जीवें भावे|, नामदेवही काही चोखोबाशी गुरुच्या तोर्या त किंवा त्याच्याकडून शिष्य म्हणून सेवा वगैरे करवून घेण्याच्या प्रकारांत पडले नाहीत. उलट चोखा माझा जीव| चोखा माझा भाव| कूळ, धर्म देव| चोखा माझा॥ एवढं उच्चतम स्थान त्याला दिलं. त्यातून तत्कालीन समाजाला त्यांनी योग्य तो संदेश दिला. नामदेवांसोबतच्या ज्ञानदेवादी अनेक संतांचा चोखोबांना सहवास लाभला. त्यामुळं चोखोबाचं आयुष्यच बदलून गेलं. पंढरपुरात दाखल झालेल्या चोखोबा आणि सोयराबाईला सर्वाधिक जीव लावला तो नामदेवांच्या घरच्या दासी जनीने. संतमंडळीत जनाबाईंचा अधिकार खूप मोठा होता.

चोखामेळा संत भला| तेणे देव भुलविला॥ अशा शब्दांत तिनं चोखोबांच्या भक्तीची ताकद जगाला सांगितली. चोखोबा आणि इतर संतांमध्ये संवाद घडवून दिला. त्यांच्यातील अनुभव, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून प्रयत्न केला. संतांना कडेखांद्यावर घेतलेल्या विठोबाचं जे चित्र जनाबाईंनं रंगवलं आहे, त्यात देवानं चोखामेळ्याला आवर्जून बरोबर घेतल्याचं वर्णन जनाबाई करते. या अस्पृश्य संताच्या घरी देव काम करत असल्याचं, म्हणजे अगदी चोखामेळ्याला मेलेली ढोरेसुद्धा देव ओढू लागल्याचं जनाबाईनं लिहून ठेवलंय.

इतर समकालीन संतांनीही चोखोबांबद्दल लिहून ठेवलंय. तत्कालीन समाजातील भेदाभेद मिटवण्याच्या नामदेवांच्या खटाटोपाला बर्याीपैकीच यश येत होतं. नामदेवांनी शैव आणि वैष्णवांमध्ये दिलजमाई घडवून आणल्याचं ठळक उदाहरण म्हणजे संत नरहरी सोनार. त्यानं थोर थोर संतांच्या मेळ्यात चोखोबा उभा असल्याचं वर्णन केलंय. तसंच चोखोबा महाद्वाराशी तिष्ठत उभा असे, याची साक्षही दिली आहे.

याशिवाय सोयराबाई, बंका, निर्मळा आणि कर्ममेळा यांच्या अभंगांतून चोखामेळ्याचं दर्शन होतं. समकालीन संतांनंतर संत एकनाथ, तुकाराम महाराज तसेच मोरोपंत यांनी चोखोबांची थोरवी गायली आहे.
चोखोबाची भक्ती कैसी| प्रेमे आवडी देवासी||
ढोरे ओढी त्याचे घरी| नीच काम सर्व करी||

असं एकनाथ महाराज म्हणतात.

तर चोखोबा माझा गणपती| राधाई महारीण सरस्वती| असं तुकाराममहाराज पहिलं नमन चोखोबा आणि सोयराबाईला करतात.

संत संताजी जगनाडे, महिपतीबुवा यांनीही चोखोबाची महती गायली आहे.

संतांच्या संगतीचं सुख लुटणार्याी चोखोबाला मात्र त्यानं वर्णन केलेल्या भूवैकुंठात, पंढरपुरात अस्पृश्यतेचे जबर चटके, फटके सहन करावे लागले. नामदेवादी संतांनी समतेचा धर्म सांगणार्याल ज्या विठोबाला शरण जा, असं चोखोबाला सांगितलं, त्या विठोबाचं प्रत्यक्ष दर्शन सनातन्यांनी त्याला घेऊ दिलं नाही. विठुरायाच्या मुखदर्शनासाठी सदैव महाद्वाराशी गहिवरून ताटकळत उभ्या असणार्या् चोखोबाला सतत हाकलून देण्यात आलं. त्यानं पुन्हा येऊ नये म्हणून त्याच्यावर नाना आळ घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली. कधी विठोबाचा हार चोरला म्हणून, तर कधी स्पर्श करून देव बाटवला म्हणून त्याला अगदी बैलांना बांधून ओढण्याची शिक्षा देण्यात आली. या छळाचं अत्यंत हृदयद्रावक वर्णन चोखोबांनी आपल्या अभंगातून केलंय.

शेवटी त्या दांडग्यांनी देवळापाशी घुटमळणार्याय ओढाळ चोखाबांची उचलबांगडी करून त्यांना नदीच्या पल्याड नेऊन सोडलं. इथून हलायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली. भरल्या डोळ्यांनी चोखोबांनी तिथूनच देवाला हात जोडले,
नेत्री अश्रूधारा उभा भीमातीरी|
लक्ष चरणावरी ठेवोनिया॥
का गा मोकलीले न येसी देवा|
काय मी केशवा चुकलोसे॥

असं स्वत:च्या अवस्थेचं वर्णन केलंय. मग चोखोबांनी इथं एक थोर गोष्ट केली. तिथल्या शेतातच झोपडी बांधून तिथं दगडी दीपमाळ उभारली. ही दीपमाळ म्हणजे, विरहाचं, बंडाचं, ज्ञानाचं, जागृतीचं, आत्मभानाचं प्रतीकच जणू. आषाढीला पंढरपूरला येणारी सर्व संतमंडळी मग चोखोबांना भेटायला त्याच्या या दीपमाळेच्या झोपडीत जाऊ लागली. खुद्द देवही त्या झोपडीत जाऊन जेवल्याची अख्यायिका आहे. या सर्व गोष्टींचा या जागेवर आता मागमूसही उरलेला नाही.

याच जागेवरून मंगळवेढ्याचं गावकूस बांधण्यासाठी त्यांना जबरदस्तीनं नेण्यात आलं. काम सुरू असताना ते कूस कोसळून इतर मजुरांसोबत आपल्या या थोर संतकवीचंही निधन झालं. आयुष्यभर देवाजवळ स्थान मिळण्याची त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गुरूनं, संत नामदेवांनी पूर्ण केली. मंगळवेढ्याहून चोखोबांची हाडं आणून ते पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारात जिथं गहिवरून, हात जोडून उभे राहत असत, त्या ठिकाणी पुरली. तिथंच त्यांची समाधीही बांधली.

आयुष्यभराच्या प्रतिकूल परिस्थितीत चोखोबांनी एक गोष्ट मात्र सोडली नाही, ती म्हणजे अभंग लिहिणं. मग ते मंगळवेढ्यात गावकीचं काम करताना, ढोरं ओढताना असो, संतांच्या सोबत चंद्रभागेच्या वाळवंटात असो की मंगळवेढ्याच्या गावकुसाचं काम करताना असो, चोखोबा आणि सोयराबाईंची लेखणी थांबली नाही. म्हणून तर आज सर्व पाउलखुणा पुसल्या जाऊनही केवळ शब्दांच्या संजीवनीवर हे दांपत्य जिवंत आहे.

चोखोबांनी सध्या उपलब्ध असलेल्या अभंगांपेक्षाही अधिक अभंग लिहिले असावेत. कारण संशोधकांना अजूनही त्यांच्या अभंगांची हस्तलिखितं सापडत आहेत. चोखोबांनी ‘विवेकदीप’ नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा उल्लेख आहे, मात्र तो अजून उपलब्ध झालेला नाही. तसंच सोयराबाईंनीही कृष्णचरित्र नावाचं काव्य लिहिल्याचा उल्लेख येतो, पण तोही संशोधकांना सापडलेला नाही.

राखेखालचे निखारे
चोखामेळा यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड केलं नाही. पूर्वजन्माचं पाप म्हणून आपण हीन जातीत जन्मलो. आपण अत्यंत क्षुद्र, तुमच्या दारीचा कुतरा, असं म्हणत वारंवार स्वत:कडे कमीपणा घेतला. इतरांना क्षणोक्षणी जोहार घातला, दुष्ट वागणूक दिली तरी नम्रतेनं मायबाप म्हटलं. त्याविरोधात कधी विद्रोह केला नाही, म्हणून चोखोबा आणि त्यांची पत्नी सोयराबाई हे प्रतीकच आम्हाला नको, अशी भूमिका आंबेडकरी चळवळीनं घेतली. पण विनम्रतेच्या राखेखाली विद्रोहाचे चटके देणारे निखारे दडले होते, याकडं विचारवंतांचंही दुर्लक्ष झालं. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ते ओळखलेलं होतं. म्हणून तर आपलं ‘The Untouchables’ हे पुस्तक त्यांनी संत चोखामेळा, नंदनार आणि रोहिदास या संतांना अर्पण केलं. आयुष्यभर विठोबाच्या दर्शनासाठी तळमळ करणार्यात चोखोबांना मंदिरात जाऊ न देणार्याक तत्कालीन मानसिकतेला आंबेडकरी भीमटोला बसणं गरजेचंच होतं. तसा तो बसलाही. पण सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता चोखोबांचा व्यवस्थेविरोधातला एल्गार हा यत्किंचितही कमी नव्हता. देवाधर्मावर टीका करणं, त्यांची परखड चिकित्सा करणं यासाठी डॉ. आंबेडकरांनाही विरोध झाला. अजूनही त्याबाबत टोकाच्या भावना असतात. या पार्श्वभूमीवर चोखोबांनी त्या काळात लिहिलेले अभंग पाहावेत.

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ|
पुराणे अमंगळ विटाळाची…॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ|
शंकरा विटाळ अमंगळ|

ब्रम्हा, विष्णू, महेशदेखील विटाळापासून वेगळे नाहीत, असं सोवळंओवळं पाळणार्या् धर्ममार्तंडांना त्यांनी त्या काळात ठणकावलं.

सोयराबाई तर त्याही पुढे गेल्या,
देहासी विटाळ म्हणती सकळ|
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध॥
देहीचा विटाळ देहीच जन्मला|
सोवळा तो झाला कवण धर्म||

‘अवघा रंग एक झाला’सारखा नितांतसुंदर अभंग लिहिणारी सोयराबाई चोखामेळ्याला मारहाण होते, तेव्हा रणरागिणीचा अवतार धारण करते.

खाइलें जेविलें त्याचा हा उपकार| दुबळीचा भ्रतार मारुं पाहसी॥, असं देवावर पिसाळलेली सोयराबाई संत नामदेवांनी पाहिली आहे. देवाला असं फैलावर घेतानाच तत्कालीन धर्मठकांचीही या उभयतांनी चांगलीच उत्तरपूजा करून ठेवली. चोखोबा एका अभंगात म्हणतात, धिक् ते पठण धिक् ते पुराण| धिक् यज्ञ हवन केले तेणे॥

असा कर्मकांडाचा सरळ सरळ धिक्कार करणार्या चोखोबांचा तो मंदिराजवळ गेला नसता तरी छळ होणार होताच, हे उघड आहे. त्यांनी विठ्ठलमंदिरात जाण्याचा प्रयत्न करणं हे केवळ त्या छळासाठीचं निमित्त ठरलं. मारहाणीनंतरही चोखोबा त्या सनातन्यांच्या ‘बा’लाही धूप घालत नाहीत. उलट
माकडाचे परि हालविती मान| दावी थोरपण जगामध्ये…॥
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग| डोलविती अंग रंग नाही॥

असं त्यांच्या ढोंगाचे बुरखे टराटरा फाडतात. असा रोखठोकपणा चोखोबांनंतर सुमारे ४०० वर्षांनी संत तुकारामांच्या अभंगातच पाहायला मिळाला. मुळात हे कुटुंब म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेतील एक चमत्कारच होता. अजूनही प्रतिकूल परिस्थितीत वैश्विक दर्जाचं काव्य लिहिणार्याक या कुटुंबाकडं आपण पुरेसं लक्ष दिलेलं नाही. रात्रंदिवस गावकीचं पडेल ते काम करणार्याड हा महार संत स्वत: तर जिद्दीनं साक्षर झालाच पण त्यानं पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका यांनाही लिहायला, वाचायला शिकवलं. अभंगांतून व्यक्त व्हायला शिकवलं. चोखोबांची ही कृती कालातीत होती.

तेराव्या शतकात जेव्हा जगभरात कुठंही उपेक्षितांचा आवाज उमटत नव्हता, दलित मुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, त्या काळात चोखोबांचं कुटुंब वंचितांच्या वेदनांना शब्दरूप देत होतं. मानवतेचं गाणं गात होतं. त्यांच्या या कार्याला केवळ धार्मिक लेबल लावून बाद करणं हा मोठा कृतघ्नपणा ठरेल.

परदेशाची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. पण हेच साहित्यिक कुटुंब युरोपातील एखाद्या प्रगत राष्ट्रात होऊन गेलं असतं तर, त्यांच्या स्मृती भव्यदिव्य स्वरूपात जतन करून ठेवल्या गेल्या असत्या. मेहुणपुरा, मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी त्यांची यथोचित स्मारकं उभी राहिली असती. त्यांच्या नावाच्या संशोधन संस्था निघाल्या असत्या. महाराष्ट्राची खरी ओळख बनलेल्या, वारकरी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणार्या या कुटुंबाचं एखाद भव्य शिल्प चंद्रभागातिरी उभं राहिलं असतं.

इथल्या सर्वच संतांचं दुर्दैव हे की ते ज्या जातीत जन्मले त्याच जातीत बांधले गेले. चोखोबाचं दुर्दैवं तर त्याहूनही अधिक. दलितमुक्तीच्या चळवळीत सहभागी झालेल्या त्यांच्या जातीबांधवांना तर त्यांचा उल्लेखही नकोसा वाटतो. दुसरीकडं आपली परंपरा समृद्ध करणार्याल या संताच्या महाद्वारातील समाधीवरचं छप्पर तरी नीट करू, असं त्यांच्या वारकरी संप्रदायाला अजूनही वाटलेलं नाही.

0 Shares
जोहार चोखोबा जोहार निरुत्तर करणारं प्रश्नोपनिषद