वारकरी

शामसुंदर सोन्नर

वारक-यांचा संत नामदेवांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातून नामदेवांचं वारकरी परंपरेतलं स्थान स्पष्ट होतं. एकाच वेळेस कीर्तन आणि पत्रकारिता करणा-या ह. भ. प. शामसुंदरमहाराज सोन्नर यांनी याचे विविध दाखले देत वारकरी नजरेतून नामदेव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

वारकरी संप्रदायानं जे संतपंचायतन मान्य केलेलं आहे, त्यात ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि निळोबारायांचा समावेश आहे. या संतपंचायतनामधील पाचही संतांची स्वतंत्र वैशिष्टय़ं आहेत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांजे राजे, नामदेव महाराज भक्तशिरोमणी, एकनाथमहाराज शांतिब्रह्म, तुकाराम महाराज वैराग्यमूर्ती तर निळोबाराय शिष्योत्तम म्हणून ओळखले जातात. वारकरी नामदेव महाराजांकडे पाहताना देवाचा लडिवाळ भक्त या दृष्टिकोनातूनच पाहतात. त्यांच्या समकालीन संतांनीही नामदेवांचं तसंच वर्णन केलं आहे. त्यांच्या चरित्रातूनही त्यांची देवाशी असलेली सलगीच दिसते. भगवान पांडुरंग आणि नामदेव महाराज यांच्यात झालेल्या संवादाचेही अनेक अभंग आहेत. या संवादावरून नामदेव आणि देव हे वेगळे राहिलेच नव्हते हेच दिसून येतं. भगवंताशी झालेल्या एकात्म भावातून हा लडिवाळपणा प्रकट झाल्याचं दिसून येतं.

वारकरी संप्रदायाची सामाजिक चळवळ उभी राहण्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या इतकंच नामदेव महाराजांचं स्थानही खूप मोठं आहे. वारकरी संप्रदाय हा ज्ञानाइतकंच भक्तीला महत्त्व देणारा आहे. किंबहुना ज्ञान मिळवित असताना त्याला भक्तीची जोड असलीच पाहिजे. भक्तीप्रेमाशिवाय मिळणारं ज्ञान अभिमान निर्माण करायला कारणीभूत ठरतं, असं सांगताना एकनाथ महाराज यांनी

भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा ।
अभिमाननित्य नवा तया माजी ।।

भक्तीचा असा महिमा वर्णन केलेला आहे. त्यातील शिरोमणी म्हणून नामदेव महाराजांकडे पाहिलं जातं. भगवंतांशी त्यांच्या असलेल्या लडिवाळ नात्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आणि अभंगातही जागोजागी पाहायला मिळतो. देवाशी असलेली सलगी हेच आपलं अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट असल्यानं इतर गोष्टींची आस नामदेव महाराजांना कधी लागली नाही. किंबहुना त्या भक्तीच्या उन्मादातच ते सदैव तल्लीन असायचे. विठ्ठलच आपली माता-पिता, अशी त्यांची धारणा होती. मुलानं आपल्या आईकडे लाडाकौतूकाने हट्ट करावा, त्याप्रमाणं नामदेव महाराजांनी अनेक हट्ट देवाकडे केले आणि देवानं ते पूर्ण केले. हा मातृभाव पुढे अनेक वारकरी संतांनी जपला. त्यातूनच मातृभावभक्तीची धारा वारकरी संप्रदायात वाढीस लागली.

शक्तीपूजकांनी आपल्या देवतेला मातृरूप मानलं आहे. मात्र ही शक्तीची रूपं अत्यंत अक्राळ, विक्राळ दिसतात. मग दुर्गा असेल, महिषासूरमर्दिनी असेल, नाही तर कालिका असेल. ही रूपं भयानक आहेत. नामदेवांनी रुजविलेल्या मातृवत्सल भक्तीमुळे वारकरी संप्रदायात विठोबाची कधी विठाई माऊली झाली, ते देव आणि भक्त दोघांनाही कळलं नाही. ही विठाई माऊली जरी झाली तरी तिचं प्रेमळ रूप मात्र बदललं नाही. उलट भक्ताच्या भेटीनं तिचा अपत्यभाव अधिकच उचंबळून येतो. भक्तीच्या भुकेनं व्याकूळ झालेल्या भक्तांना ती प्रेम पान्हा पाजते. या आईच्या सानिध्यात प्रेमाचं भरतं येतं. त्या भक्तीच्या आर्ततेत मग शक्तीपूजकांप्रमाणं वारकरी संतही या विठाई, किठाई, कृष्णाई, कन्हाईच्या नावानं गोंधळ घालतात. नामदेवरायांनी `विठाई सावळे डोळसे रंगा येई वो`, असं गोंधळाला येण्याचं आवाहन केलं आहे. नामदेवांचा या विठाईबद्दलचा जिव्हाळा इतका पराकोटीचा होता की आपल्या जीवीचे सर्व अंतर्भाव तिलाच विश्वासानं सांगितले आहेत. आपल्या आयुष्याचा सारा शीण, व्यथा, कथा आणि इतर सर्व जगताना जे अनुभवाला आलं ते त्यांनी इतरांपुढे मांडण्याऐवजी केवळ विठाईकडेच मांडलेलं आहे. आईपासून लेकरू दूर झाल्यानंतर जसं व्याकूळ होतं तीच आर्तता नामेदवरायांच्या अभंगातून प्रकट होते.

डोळे शिणले पाहता वाटुली। अवस्था दाटली हृदयामाजी।
तू माझी जननी सरश्रीये सांगातीनी। विठ्ठले धावोनी देई क्षेम।।

नामदेव महाराजांच्या अनेक अभंगांतून मातृभक्तीनं पावन झालेली वात्सल्य रसाची भावगंगा ओसंडून वाहताना दिसते. ये गे विठ्ठले अनाथाच्या नाथे, तू माझी जननी काय गे साजनी, तू माय माऊली म्हणूनी आस केली. अशा अनेक अभंगांतून त्यांचा वत्सलभाव प्रकट झाला आहे. नामदेवरायांच्या या मातृभक्तीचा झरा पुढे वारकरी संप्रदायात वाहत राहिला आणि अनेक संतांनी मग विठाईची करुणा भाकली.

त्यातूनच वारकरी संप्रदायातील संत आणि देव यांच्यात कौटुंबिक नातं तयार झालं. त्यातूनच मग कुटुंबात होणारा संवाद संत आणि देवामध्ये झालेला दिसून येतो. जिव्हाळ्याच्या नात्यानं सलगी झाल्यानं देवाविषयीचे भय नाहीसे होऊन तिथे प्रेमभाव वाढीस लागले. देव कुणीतरी महान आहे. त्याला दूरून नमस्कार केला पाहिजे. त्याची भक्ती केली नाही, त्याचा अनादर केला तर त्याचा कोप होईल, ही देवाबद्दलची भयानक भीती समाजमनावर होती ती भीतीच नामदेवांनी घालवून टाकली. देव हा कुणी दूरचा, परका नसून तो आपला सखा आहे, सोबती आहे आणि सांगाती आहे हा भाव त्यांनी रुजविला.

सख्यासोबत्याबरोबर जसा अनेकदा अनुराग होतो आणि त्यातून वादाला तोंड फुटते, तसा वाद नामदेवांनी अनेक ठिकाणी देवाबरोबर घातलेला आहे. देवाच्या पतितपावन ब्रीदावळीलाच नामदेवांनी आव्हान दिलं आहे. देवा, तू पतितपावन आहेस म्हणून तुझ्या दारात आलो. परंतु त्याची कुठलीही लक्षणं तुझ्यामध्ये दिसत नसल्यामुळे मी इथून माघारी जातो. तूझं औदार्यही खोटं आहे, असं सुनावताना नामदेव महाराज म्हणतात,

`घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार।
काय धरू देवा तुझे कृपणाचे द्वार`

नामदेवांच्या गाथेत अनुरागानं भरलेले अनेक अभंग पाहायला मिळतात. नामदेवांची ही धिटाई त्यांच्या घरी राहणा-या जनाबाईमध्येही आली. जनाबाईचा अनुराग तर नामदेवांच्या पुढच्या पायरीवर गेलेला होता. नामदेवांनी फक्त आपली नाराजी व्यक्त केली. जनाबाईने थेट देवाच्या विरोधात बंड पुकारून कडकडीत शिव्या दिल्या.

अरे विठ्या विठ्या विठ्या। मूळ माईच्या कारटय़ा।
तुझी रांड रंडकी झाली। जन्म सावित्रा चुडा ल्याली।।

अशा शब्दात देवाला तिनं खडसावलं. अर्थात ही धिटाई केवळ नामदेवांच्या संगतीत असल्यामुळेच तिला शक्य झाली.

नामदेवांना भगवंताशी असलेल्या लडिवाळ नात्यापुढे इतर कशाचीही फिकीर नसायची. देवाशी असलेल्या त्यांच्या जवळीकीची इतर संतांमध्येही चर्चा होती. देवाचा इतका लाडका भक्त असणा-या नामेदवाला भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी, असा मोह सर्वच संतांना व्हायचा. परंतु देवाच्या सानिध्याशिवाय इतर कशातही नामेदेवांना सुरुवातीला रस नव्हता. नामदेवांची कीर्ती ऐकून ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह पंढरपूरला गेले होते. इतर संत त्यांच्यासोबत होते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरादी संतांनी नामदेव महाराजांना नमस्कार केला. पण आपण देवाचे लाडके भक्त आहोत या उर्मीतच तल्लीन असलेल्या नामदेवांनी प्रतिनमस्कार केला नाही. ही बाब मुक्ताबाईला खटकली. देवाशी सलगी असल्याचा नामेदवांना अभिमान झाला आहे, अशी भावना तिच्यामध्ये निर्माण झाली. त्यातूनच तिनं नामदेवांना अत्यंत कठोर शब्दात खडसावलं-

अखंड जयाला देवाचा शेजार।
कारे अहंकार नाही गेला।।
मान अपमान वाढविशी हेवा।
दिवस असता दिवा हाती घेशी।।

आपल्या ज्ञानी भावंडांना नमस्कार न केल्याचा राग जरी मुक्ताबाईच्या बोलण्यातून व्यक्त झालेला असला तरी नामदेवाला अखंड देवाचा शेजार लाभला, प्रेम मिळालं हे मुक्ताबाईंनी मान्य केलेलं आहे.

नामदेव आणि देवांमधील लडिवाळपणाच्या कथा त्यांच्या चरित्रातून जशा पाहायला मिळतात, तशा त्यांच्या अभंगांतूनही दिसून येतात. ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्र सोडून तीर्थयात्रेसाठी भारत भ्रमण करण्याचा निर्धार केला. त्यावेळी नामदेव महाराजांना सोबत येण्याची विनंती केली. देवापासून आपल्याला एक क्षणाचा अंतराय होऊ नये म्हणून नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांसोबत तीर्थयात्रेला जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडेच परवानगी मागायला सांगितलं. तेव्हा देव आणि नामदेवांचा संवाद अभंगरूपालं आलेला आहे.

नामदेव महाराज देवाकडे जातात. देवाला सांगतात, ‘देवा, ज्ञानेश्वर महाराज मला आपल्या सोबत येण्याची गळ घालत आहेत. पण देवा मी तुला सोडून जाणार नाही. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. तीर्थयात्रा नको, पुण्य नको, मोक्ष नको मला कशाचीच गरज नाही. देवा मला केवळ तुझ्या चरणाच्या सेवेचेच सुख जगातील सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ आहे. मला इतर कोणत्याही मोहात अडकायचे नाही. त्यामुळे मी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जाणार नाही.’ यावेळी नामदेव महाराजांचा प्रेमभाव हा करुण रसाच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहचलेला दिसतो. मात्र त्याच वेळी देव नामदेवाला कुरवाळतात आणि सांगतात- नाम्या, अरे तू ज्ञानेश्वरांबरोबर गेलास म्हणून माझ्यात आणि तुझ्यात अंतर पडणार नाही. कारण मीच ज्ञानदेव आहे-

देव म्हणे नाम्या पाहे। ज्ञानदेव मीच आहे।।

इतर संतांनी देवाशी संवाद साधल्याचं, करुणा भाकल्याचं, त्यानं प्रसन्न होऊन रक्षण केल्याचे अनेक अभंग पाहायला मिळतात. मात्र देवांनी येऊन त्यांच्याशी संवाद साधल्याचे अभंग रूपानं फारच कमी दाखले उपलब्ध आहेत. नामदेव महाराजांच्या गाथेत असे दाखले अनेक मिळतात.

विरह भावनेनं केवळ नामदेव व्याकूळ होतात असं नाही तर देवही संतांच्या विरहानं व्याकूळ होतात. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरात आलेले वारकरी जेव्हा परत आपापल्या गावाकडे निघतात तेव्हा भगवंतही व्याकूळ होतात. हृदयात दाटलेली विरहाची भावना नामदेवाकडे व्यक्त करताना देव म्हणतात-

तुम्ही जाता गावा। हूरहूर माझ्या जीवा।
भेटशी केधवा मजला लागी।।
तिन्ही त्रिभूवनी। मज नाही कोणी।
म्हणे चक्रपाणी। नामयाशी।।

असं गुज देव नामदेवरांशी सांगतात, व्याकूळ होतात. अशी अभंगरचना नामदेवांच्या गाथेत आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या अभंगातही देवाच्या मुखातून निघालेले अनेक उद्गार अभंग रूपानं प्रकट झालेले आहेत. या अभंगातील देवाचं मनोगत कसं प्रगट झालं? देव नामेदवांना कधी हे गुज सांगायचे, असे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा त्याचं उत्तर हे नामदेवांच्या एकविध भक्तीत मिळतं. प्रेमानं, भक्तीनं नामदेव महाराज भगवंतांशी इतके एकरूप झालेले होते की देव आणि नामदेव हा भेदच उरलेला नसावा. या भेदाभेदाच्या पलीकडे गेलेल्या नामदेवांच्या मुखातूनच देवाच्या अंतरीचे बोल प्रगट होताना दिसतात. असा देव आणि भक्तीचा अतूट भाव नामदेव महाराजांच्या चरित्रात दिसत असल्यानंच वारकरी संप्रदायानं नामदेवाला भगवंतांचा लडिवाळ भक्त म्हणून संबोधलेलं आहे.

वारक-यांचे नामदेव

नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।, अशी साद घालीत नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली. वारक-यांनी नित्य आचारणासाठी जे `नेमाचे भजन` ठरविलेलं आहे त्यात नामदेव महाराजांच्या अभंगांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. `काल्या`ची परंपरा सुरू करून नामदेवांनी सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली. वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. तसंच कीर्तन अथवा भजनाचा समारोप नामदेव महाराजांच्या पसायदाशिवाय होऊच शकत नाही. यावरून त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं.

नामदेवपूर्व काळात महाराष्ट्रात नारदीय कीर्तनपरंपरा प्रचलित होती. नारदीय कीर्तनपरंपरेत एकच बुवा निरूपण करायचे. बाकी सर्वांनी फक्त ते ऐकायचं. सर्व कारभार एकहाती होता. इतरांना त्यात स्थान नव्हतं. नामदेवांनी वारकरी कीर्तनपरंपरा सुरू करून कीर्तनातील प्रत्येक व्यक्तीला त्या कीर्तनाचा भाग बनविलं. त्यात टाळकरी, गायक, वीणेकरी, मृदंगमणी यांचा प्रत्यक्ष सहभाग असतोच. पण खाली बसलेली व्यक्तीही टाळी वाजवून त्या कीर्तनात साथ करीत असते. यात सर्वांना सारखं महत्त्व असल्याचा भाव रुजविण्याचा हेतू असावा. यात नामदेवांनी मोठी सामाजिक समता साधल्याचं दिसून येतं.

इतकंच नव्हे तर स्त्रियांचा आदर करण्याची भावनाही त्यांनी वाढीस लावली. पंढरीच्या वाळवंटात नामदेवांनी सर्व संतांना निमंत्रित केल्याचा एक प्रसंग आहे. त्यात ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपनकाका, मुक्ताई यांच्याशिवाय गोरोबा काका, उत्तर प्रदेशातून खास कबीर त्या संत मेळ्याला आले होते. या संपूर्ण संतसंमेलनाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी नामदेवांनी आपल्या घरात दासीचं काम करणा-या जनाबाईकडे दिलं होतं. त्यात कुणी कीर्तन करावं, कुणी अभंग म्हणावा, कुणी भजन करावे याचे आदेश जनाबाई देत होती याचा पुरावा जनाबाईच्याच अभंगात मिळतो. जनाबाई म्हणते-

नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।
जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग।।

ज्ञानेश्वर महाराजांना आदेश देताना जनाबाई सांगते, आता नामदेव कीर्तन करणार आहेत. ते कीर्तन इतकं रंगतं की स्वत: पांडुरंग त्या कीर्तनात नाचतात. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही अभंग म्हणा. दासीचं काम करणा-या महिलेला संतसंमेलनाचं नेतृत्व करण्याची जबबादारी देऊन केवढी सामाजिक समतेची नांदी नामदेव महाराजांनी घातली होती हे दिसून येतं.

काल्याच्या प्रसंगातून अशाच समतेचा विचार त्यांनी रुजविलेला आहे. त्यांनी पहिला काला केला तेव्हा परिसा भगवत या ब्राह्मणांकडून दही आणलं, गोरोबा काका कुंभाराकडून मडकं आणलं, चोखा महाराच्या घराच्या लाह्या आणल्या. वेगवेगळ्या जातींतील संतांच्या घरातून आणलेल्या वस्तू एकत्र करून त्याचा `काला` केला. त्यातून सर्वांना समान हक्क असल्याची भावना दिसून येते. ही भावना वाढीस लागावी यासाठी कोणत्याही वारकरी महोत्सवाची सांगता `काल्या`नं करण्याचा दंडक घातला. आजही सर्व वारकरी तो पाळतात.

वारकरी संतांच्या नित्यनेमाच्या भजनात नामदेव महाराजांनी वेगवेगळ्या प्रकरणांत लिहिलेल्या अभंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात बाळक्रीडा, तीर्थावळी, समाधी, नाटाचे अभंग यांचा समावेश आहे. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला आळविणा-या करुण रसातील अभंगाशिवाय काकड्याची सांगता होत नाही. गवळणी, वासुदेव, आंधळा, पांगळा या प्रकारात मोडणारी अभंग रचनाही वारकरी भजनात महत्त्वाची ठरते. वारक-यांचं भजन असो अथवा कीर्तन, त्याची सांगता नामदेव महाराजांच्या `अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा` या पसायदानाशिवाय होऊच शकत नाही.

0 Shares
विनोबा भेटती नामयासी नामदेवराया, तुम्ही हवे आहात!