विश्वरूपदर्शन

प्रशांत जाधव

नरसी नामदेव हे हिंगोली जिल्ह्यातलं छोटंसं गाव संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत, पण तिथे नामदेवांचा जन्म झालं ते घरही आहे. एक वस्त्रसमाधीचं मंदिरही आहे. पंजाब आणि राजस्थानातूनही भाविक तिथे येत असतात. तीर्थस्थळ म्हणून सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत ‘झी २४ तास’च्या वेबसाईटचे प्रमुख प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. नरसीभेटीचे त्यांचे हे अनुभव.

संत नामदेव हे तेराव्या शतकातले. आता सुरू आहे एकविसावं शतक. जवळपास आठशे वर्ष झाली. त्याकाळी नामदेव आजच्या पाकिस्तानापर्यंत गेले होते. कदाचित अफगाणिस्तानापर्यंतही. दक्षिणेत अगदी रामेश्वरमपर्यंत त्यांनी तीर्थयात्रा केल्या होत्या. या प्रत्येक ठिकाणी आजही त्यांचा कमी अधिक प्रभाव दिसतो. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तरांचल इतक्या राज्यांमधे तरी त्यांच्या काहीना काही स्मृती आढळतातच. सद्विचारांच्या सूईने देशाच्या एवढ्या मोठ्या प्रदेशाला आठशे वर्षांपूर्वी जोडणं जवळपास अशक्यप्राय गोष्ट मानायला हवी. कारण तेव्हा ना आजच्यासारखे रस्ते होते, ना वाहनं. तरीही नामदेवांनी कठीण ते सोपं करून दाखवलं.

थोडं गमतीनं म्हणायचं, तर या महान संतांच्या जन्मगावी पोहोचणं तेराव्या शतकात होतं तेवढंच आजही कठीण आहे. नामदेवांचं जन्मगाव नरसी नामदेव. मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरचा जिल्हा हिंगोली. तालुकाही हिंगोली. मुंबईहून किंवा कोणत्याही मोठ्या शहरातून थेट नरसी नामदेवला जाणारी थेट गाडी नाही. मुंबईच्या माणसाला परभणीला येऊन हिंगोलीमार्गे नरसीला जावं लागतं. परभणी ते हिंगोली हे अंतर साधारण ७६ किलोमीटर आणि हिंगोली ते नरसी नामदेव हे अंतर १६ किलोमीटरचं. दोन वेळा गाडी बदलावी लागते.

मनमाड सोडलं की मराठवाड्यातल्या जुन्या निजामशाहीच्या खाणाखुणा दिसू लागतात. पडक्या मशिदी. जुन्या स्टेशनांच्या इमारती आणि लोकांच्या वागण्या बोलण्याच्या तऱ्हा. नरसी हे काही रेल्वे स्टेशन नाही. ट्रेननं उतरायचं ते परभणी स्टेशनलाच. तिथून एसटी. साधारण दोन ते अडीच तास प्रवास झाला की हिंगोली शहर दिसायला लागतं. जिल्हा तसा फार जुना नाही. मे महिन्याचे दिवस. भीषण दुष्काळ. त्यात मराठवाडा. रणरणतं ऊन. दूरदूरवर पाण्याच्या खुणा नाहीत. गुरांना खायला चारा नाही की पाणी नाही. गुरांची खपाटीला गेलेली पोटं. आणि गरिबांचीही. माणसांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट डोकावणारी अवकाळाची भीषणता. नजर जाईल तिथपर्यंत तापत्या झळा…

विंडो सीट म्हणजे गार हवा. पण इथे तापलेल्या लाल डब्याच्या खिडकीतून येणाऱ्या ज्वाळा ‘खाव्या’ लागतात. जिल्ह्याचं ठिकाण असूनही हिंगोलीचं बस स्टँड मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या पार छोट्या गावच्या बस स्टँडशी स्पर्धा करणारं. निजामाच्या काळात लष्कराचा तळ म्हणून या गावानं आकार घेतला. १ मे १९९९ मध्ये या परभणीतून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा बनून एक तप उलटून चाललं पण आजही मुंबईतून रेल्वेनं रात्री नऊ वाजता निघालेला माणूस हिंगोलीत पोहचेपर्यंत दुस-या दिवशी दुपारचे अकरा वाजतात.

हिंगोलीत डॉ. जब्बार पटेलना भेटायचं होतं. डॉ. जब्बार पटेल म्हटलं, की ‘सिंहासन’ आणि ‘घाशीराम’चे दिग्दर्शक डोळ्यासमोर येतात. पण डॉ. सय्यद जब्बार पटेल ते नाहीत. हे आहेत साहित्यिक आणि कवी. हिंगोलीच्या कृषि उत्पन्न बाजार समितीचे सेक्रेटरी. त्यांचा इथे संबंध असा, की त्यांनी पीएचडी केलीय ती संत नामदेवांच्या साहित्यावर. उत्सुकता होतीच, नामदेव आणि जब्बार पटेल हे कॉम्बिनेशन कसं काय, असं विचारून गेलो. हा प्रश्न त्यांना नेहमीचाच असावा. ‘मुस्लिम असून संत साहित्याचा अभ्यास…’, असं विचारायच्या आतच समोरून उत्तर आलं. ‘संत हे कोणत्या जाती धर्माचे नसतात. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी जन्म घेतलेला असतो.’ एक सरळ चेंडू आणि मी क्लिन बोल्ड. ‘संत नामदेवांच्या गाथेकडे एक अभ्यास म्हणून वळलो. त्यातून त्यांच्या साहित्यातील अनेक गोष्टींची अनुभूती झाली. संत नामदेव आपल्या जवळच्याच नरसीचे असल्याचं कळाल्यावर अधिकच जवळीक निर्माण झाली…’ जब्बार पटेल बोलत होते. सूर्य आग ओकत होता पण जब्बारभाईंशी गप्पांमध्ये मनावर जणू पहिल्या पावसाचा शिडकावा होत होता…

हिंदू अंधा तुरक काणा। दो हाते ग्यानी श्याना।
हिंदू पूजे देहुरा। मुसलमान मसीद।
नामें सोई सेव्या। जह देहुरा मसीति ना ।

असं सर्व धर्मांच्या पलीकडे जाणारं तत्त्वज्ञान नामदेवांनी आठशे वर्षांपूर्वी पेरून ठेवलं. आजही त्याला कोंब फुटताना दिसत आहेत. नामदेवांनी एका गवळणीत श्रीकृष्णाच्या पाच गवळणींचं वर्णन केलं आहे. त्यातली एक गोपिका मुसलमान आहे. कृष्णाची गोपिका आणि तीही मुस्लिम हे नामदेवांसारखा महान संतच करू जाणे.

जब्बारभाईंचा नामदेवांचा अभ्यास गाढा आहे. त्यांच्या पीएचडीचा विषय नामदेवांच्या अभंगांचा होता. त्यांचा प्रबंध हा त्या वर्षीचा युनिवर्सिटीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधही ठरला होता. पण त्यांचा आवडीचा विषय म्हणजे नामदेवांचं जन्मस्थान. महापुरुषांच्या पाचवीला जन्म, जन्मतिथी आणि जन्मस्थानाविषयीचे वाद पूजलेले असतातच. नामदेवही त्याला अपवाद नाहीत. पूर्वी नामदेवांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या ‘नरसी’चा असल्याचं मानलं जात असे. पण बार्शीजवळची ही नरसी कोणालाच कधी सापडली नाही. अनेकजण कृष्णेकाठचा एक नामदेव पार दाखवून कऱ्हाडजवळच्या नरसिंगपूरलाच नरसी मानत आले होते. त्यात अनेक मोठे अभ्यासकही होते. खुद्द नामदेव आणि जनाबाईंच्या अभंगांचा दाखला देऊन अनेकजण नामदेवांचा जन्म पंढरपुरात झाल्याचा दावा करतात. पण जब्बारभाई नरसीच्या बाजूनं जोरदार खटला चालवतात.

नामदेव हिंगोलीजवळच्या नरसीचेच असल्याचे चौदा पुरावे जब्बारभाईंनी आपल्या पुस्तकांतून मांडले आहेत. नामदेवांचे पूर्वज सांगली जिल्ह्यातल्या शिराळे तालुक्यातील रिळे या गावचे. त्यामुळे नामदेवांचं आडनाव शिंपी नाही तर रिळेकर. शिंपी हे आडनाव नसून ही संस्कृती आहे. कापडाच्या व्यापाऱ्यानिमित्त यदूशेट (नामदेवांचे मूळपुरुष) हे सांगलीहून नरसीला आले होते. त्यानंतर त्यांच्या पाच पिढ्या नरसीला राहिल्याचे पुरावे आहेत. नामदेवांचे वडील दामाशेठ आणि त्यांची आई गोणाई यांचा विवाह नरसी येथेच झाला, याचा उल्लेख नामदेवांच्या अभंगात आहे. नामदेवांची आई किन्ही गावची. हे गाव एलदरी धरणात गेल्यामुळे सध्या ते परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात वसलं आहे. नामदेवांच्या आईनं पुत्रप्राप्तीसाठी केशीराजाला नवस केला होता. केशीराज हे नरसीचं ग्रामदैवत. नामदेवांची शिष्या जनाबाई ही जवळच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथली आहे. नामदेवांचे पूर्वापार घर आणि वस्त्र समाधीमंदिर हे नरसी या गावी आहे. नामदेवांची पुतणी धाडी हिच्या अभंगावरूनही नरसी हेच नामदेवांचं जन्मगाव आहे याला आधार मिळतो. पंजाबातील शीख बांधव नरसीलाच नामदेवांचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून उभारत आहेत.

नामदेवांविषयी सविस्तर सांगताना जब्बारभाई नामदेवमय झाले होते. नामदेव आपल्या वडिलांसह लहानपणीच पंढरपुरला वारीनिमित्त गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे नामदेवांचे वंशज किंवा नातेवाईक असा कोणताही परिवार सध्या नरसी नामदेव किंवा हिंगोली परिसरात नाही. परंतु, त्यांची जमीन आणि घर नरसी नामदेव या ठिकाणी सर्व्हे क्रमांक ६१ मध्ये असल्याचे पुरावे सापडतात. शीख भाविक या घराला सात मजली स्मारक म्हणून उभारणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं.

पूर्वी नरसी बामणी म्हणून ओळखलं जाणारं गाव आता नरसी नामदेव म्हणून ओळखलं जातं. परभणी जिल्हा पूर्वी निजामाच्या हैदराबाद संस्थानात होता. बामणी हे परभणी जिल्ह्यातील एक पोलिस ठाणं होतं आणि नरसी हे तालुक्याचं ठिकाण होतं. विदर्भाच्या सीमावर्ती भागात असल्यामुळे लष्कर नरसी ते बामणी अशी गस्त घालत असे. त्यामुळे या ठिकाणाला नरसी बामणी, असं नाव पडलं. आजही नरसी आणि बामणी ही दोन वेगवेगळी गावं अस्तित्वात आहेत. बामणी हे गाव जिंतूर तालुक्यात गेलं आणि नरसी हे हिंगोली जिल्ह्यात आलं. नरसिंहाचं मंदिर असल्यामुळे या गावाला नरसी, असं नाव पडलं. इति जब्बारभाई

नरसी नामदेव गावात नामदेवांच्या काळापासून अठरापगड जातींचे लोक राहतात. साधारण दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची स्थिती आजही फारशी सुधारलेली नाही. मराठवाड्याच्या गावांत दिसतात तशी जुनी पडकी घरं. टिपिकल खेडेगाव शोभावं असा या गावाचा चेहरा मोहरा. नरसी नामदेव हे नामदेवांचं जन्मठिकाण असल्याचा सुगावा १९९७ मध्ये शीख भाविकांना लागला. त्यानंतर या गावाचा थोडाफार विकास झालेला दिसतो.

जब्बारभाईंचा निरोप घेऊन मी हिंगोलीहून नरसीला निघालो. सोबत होते राष्ट्रसंत नामदेव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सतीश विडोळकर. बोलताना कोणाचीही भीडभाड न ठेवणारा, बेधडक व्यक्तिमत्त्वाचा पण साधं राहणीमान असलेला हा माणूस. प्रवासात त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केलेले उपक्रम सांगितले. आतापर्यंत कोणत्याही देवस्थानात नाही इतक्य़ा समित्या विडोळकरांनी देवस्थानावर केल्या आहेत. पाणीपुरवठा, माहिती जनसंपर्क आदी, अर्थ आणि नियोजन, यात्रा उत्सव समिती. या माध्यमातून नरसी नामदेवमधील अनेकांना त्यांनी या कामात सहभागी करून घेतलं आहे. तसंच मंदिर परिसरात एक सभागृहही उभारलं आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संस्थानानं स्वतःच्या पैशातून शेडही उभारलं आहे. गर्दीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. संस्थानाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप यावं, म्हणून काही प्रमाणात जागाही त्यांनी विकत घेतली आहे. त्याला संरक्षक भिंतही घातली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानच्या माध्यमातून अखंड वीणा पहारा समाधी मंदिरात सुरू आहे. या परिसरातील ७० गावांनी हा वीणा पहारा वाटून घेतला आहे. प्रत्येक जण आपला नंबर आल्यावर या ठिकाणी येतो आणि खडा पहारा देतो. मात्र, यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून झालेल्या बेपर्वाईचाही पाढा वाचला. ‘मराठवाडा ही संतांची भूमी. परंतु, सरकारचं याकडे दुर्लक्ष होत आहे. संत नामदेवांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला असता तर त्यांच्या जन्मगावाच्या विकासासाठी सरकारनंच पुढाकार घेतला असता.’ विडोळकरांच्या बोलण्यात चीड जाणवत होती. ‘नरसीला शासनाने ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. परंतु, अजूनही विकासकामं झालेली नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थळं आणि मराठवाड्यातील समाधीस्थळं यांच्यात जमीन-आसमानाचा फरक दिसतो. शासनानं मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं आहे.’ त्यांच्या बोलण्यात शासनाच्या दुटप्पी धोरणाबद्दल संताप होता.

हिंगोलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर नरसी नामदेव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावातल्या विकासाच्या दुष्काळाची चाहूल लागते. सेनगाव-रिसोडकडे जाताना १६ किलोमीटरवर असलेल्या या गावात दोन किलोमीटर लांबून पाण्याची टाकी दिसते. पण त्या टाकीमध्ये फक्त एकदा पाणी आलं होतं. तेही केवळ टेस्टिंगसाठी. त्यानंतर पाणी काळं असतं की गोरं, हे त्या टाकीला माहीत नाही. २३ गाव पाणी योजनेतून गावात टाकी बांधली गेली, नळ टाकण्यात आले. पण पाणी मात्र नाही. बोअरिंग आणि विहिरीच्या पाण्यावर गावाची गुजराण होते. पण गावात समाधीस्थळापर्यंत जायचा रस्ता आहे. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना येथे येणार होते. त्यामुळे हा रस्ता तयार झाला. झैलसिंग आले नाहीत पण त्यांच्यानिमित्तानं गावात रस्ता आला. जो अजूनही आहे. गावाच्या नाक्यावर काही टपऱ्या आहेत. गावात साधं पोलिस ठाणंही नाही. आता ते लवकरच बनणार आहे म्हणे.

त्या ऐतिहासिक रस्त्यानं आम्ही समाधीपर्य़ंत पोहचलो. गावापासून उत्तरेला एक किलोमीटर अंतरावर नामदेवांचं समाधीमंदिर आहे. नामदेवांची नरसीतील समाधी ही संजीवन समाधी नाही तर वस्त्रसमाधी आहे. नामदेवांचं वस्त्र घेऊन ही समाधी बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. नदीकाठी गर्द झाडीच्या परिसरात नामदेवांची एक सोडून दोन वस्त्रसमाधी मंदिरं आढळतात. दोन समाधीमंदिरं कशी याचीही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पूर्वी नामदेव महाराजांचं एकच वस्त्रसमाधी मंदिर होतं. ते येथील गुरवाच्या ताब्यात होतं. कालांतरानं गावात गुरवाची दोन घरं झाली. मराठवाड्यात समाधीवर शंकराची पिंड ठेवण्याची पद्धत आहे. समाधीमंदिराच्या परिसरात अशा अनेक समाधी आहेत. त्यातल्याच एका पिंडीवर दुसऱ्या गुरवानं नामदेव महाराजांचा मुखवटा तयार करून बसवला आणि नित्यनियमानं पूजा करू लागला. त्यामुळे आता या परिसरात नामदेवांची दोन समाधीमंदिरं दिसतात. दुसऱ्या समाधी मंदिराचा मुखवटा हा एका शंकराच्या पिंडीवर असल्याचं कुणीही पाहू शकतं.

मुख्य समाधीमंदिरातील काळ्या पाषाणात घडविलेली संत नामदेवांची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. विठू-रखूमाईच्या पार्श्वभूमीवर असलेली नामदेवांची मूर्ती भक्ताशी संवाद साधते की काय, असं वाटतं. मूर्तीची सजावट अत्यंत साध्या पद्धतीनं पण आकर्षक केलेली असते. मराठवाड्यातील ग्रामीण ढंगात बांधलेला फेटा आणि कपडे यामुळे नामदेव प्रत्यक्षात या ठिकाणी असल्याचा भास होतो. या काळात गर्दी नसल्याने मनसोक्त दर्शन घेता येते. गर्दी असते ती पापमोक्षदा एकादशीला. आषाढी वारीत पांडुरंगाच्या दर्शनानंतर पापमोक्षदा एकादशीला वारकरी नरसी येथील नामदेवांचं दर्शन घेऊनच आपल्या घरी जातात. सुमारे एक ते दोन लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात, असं मंदिराच्या माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष गिरीश वरूडकर यांनी सांगितलं. नांदेडला जे शीख भाविक येतात, त्यातील बहुतांश गाड्या करून एका दिवसासाठी का होईना, या ठिकाणी दर्शनाला येतात. मराठी भाविकांपेक्षा शीख भाविक नामदेवांना अधिक मानतात. या ठिकाणी दानपेटीत डॉलर आणि पौंडही मिळतात, असं काही गावकऱ्यांनी सांगितले.

मंदिराच्या परिसरात शंकर महाराज सातारकर यांचं नव्यानं बांधलेलं मंदिर आहे. शंकर महाराज यांनीच नामदेवांच्या समाधीमंदिराचा जीर्णोद्धार केला. शंकर महाराजांचं साधारण तीस वर्ष या ठिकाणी वास्तव्य होतं. सुरुवातीला त्यांनी जवळच असलेल्या कयाधू नदीवर घाट बांधला. १९८०मध्ये सध्या असलेल्या समाधी मंदिराच्या केवळ भिंती बांधलेल्या होत्या. शंकर महाराजांनी दर एकादशीला येथे येणाऱ्या भाविकांकडून एक-एक रुपया गोळा केला. त्याची पावती देऊन हे मंदिर उभं केलं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचीही समाधी आणि त्यावर मंदिर बांधण्यात आलं आहे.

समाधी मंदिर कयाधू नदीच्या काठी आहे. ‘आपली काया धूते अशी ती कयाधू नदी’. अस्थी विसर्जनासाठी अनेक जण विदर्भ, मराठवाड्यातून या ठिकाणी येतात. समाधी मंदिरासमोरील नदीच्या ठराविक भागात मृत व्यक्तींच्या अस्थी पाण्यात विसर्जित केल्या तर त्या विरघळतात. अजूनही याचं सायंटिफीक कारण समजू शकलेलं नाही. मेलेल्यांच्या हाडाचं ठीक आहे. पण जिवंत माणसांची हाडंही नदीच्या पाण्यात जास्तवेळ राहिली की ठिसूळ होतात. गावकरी तसे आपले अनुभव सांगतात.

समाधीमंदिराचं दर्शन घेतल्यावर आता नामदेवांचं मूळ घर पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे विडोळकरांना ते घर दाखविण्याची विनंती केली. या ठिकाणी नामदेव कोणाचे या वादाची ठिणगी पहिल्यांदा दिसली. मंदिर आणि मंदिराचा परिसर हा नामदेव महाराज ट्रस्टच्या अखत्यारित येतो. पण नामदेवांचं घर हे सध्या पंजाबमधून आलेल्या शीख भाविकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे विडोळकर या ठिकाणी जाण्यास उत्सुक नव्हते. ‘घर पाहण्यासाठी शिखांकडून चावी घ्यावी लागते, मला ते पटत नाही, म्हणून मी अजिबात त्या ठिकाणी जात नाही, विडोळकरांनी आपली बाजू मांडली.

पण हे घर पाहिल्याशिवाय नरसीला येण्याचा उद्देशच सफल होणार नव्हता. आग्रह केल्यानंतर विडोळकरांनी गाडी वळवली. एका चिंचोळ्या रस्त्यातून वाट काढत आम्ही एका घरासमोर थांबलो. सिमेंट काँक्रिटनं पहिले दोन मजले बांधलेले घर पाहून मला प्रथम विश्वास बसला नाही. भल्या मोठ्या लोखंडी गेटमधून आत प्रवेश केला. प्रवेश केल्याकेल्या डाव्या बाजूला एक मोठी विहीर होती. ही विहीर बांधण्यासाठी ब्रिटनमधील जसवीर कौर भट्ट यांनी २००३मध्ये ७९,८०० रुपये देणगी दिल्याची दगडी पाटी होती. दुमजली भव्य वास्तूत प्रवेश केल्यावर ७० बाय ३५ फुटांचं जुनं दगडी बांधकाम असलेली छोटी वास्तू पाहायला मिळाली. हे ते नामदेवांचं मूळ घर. घराच्या मध्यभागी एक छोटा दरवाजा आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी उजवीकडून एक छोटा दरवाजा करण्यात आला आहे. कोणताही माणूस खाली बसूनच या ठिकाणी प्रवेश करू शकतो. याची देखभाल शीख भाविक करतात. त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं आपल्याला डोकं झाकून आत प्रवेश करावा लागतो. डोकं न झाकता या ठिकाणी प्रवेश करायला बंदी आहे. या ठिकाणी पोहचल्यावर नामदेवांचं दुसरंच रूप पाहायला मिळतं. आपले नेहमीचे पुणेरी पगडी, बाराबंदी, धोतर आणि वीणेतले नामदेव इथे नाहीत. इथे त्यांच्या डोक्यावर शिखांचं पागोटं, वाढलेली दाढी मिशी, हातात वीणेऐवजी एकतारा. मी हे नामदेव पहिल्यांदाच पाहत होते. नरसीमध्ये नामदेवांच्या दोन समाधी आहेत. तसेच दोन नामदेवही. एक मराठी नामदेव आणि दुसरे पंजाबी.

नामदेवांच्या घराची देखभाल आता शीख भाविक करतात. पंजाबमधील विशेषतः शिंपी समाजातील एक व्यक्ती दीड-दोन महिने सेवा देण्यासाठी या ठिकाणी येतो. सध्या गेल्या एक महिन्यापासून प्रीतमसिंग सेवेकरी म्हणून वास्तव्याला आहेत. वय वर्ष सत्तर. दिवसभर येणाऱ्या भाविकांना प्रसाद देणं, परिसराची देखभाल करणं, हे यांचं काम. पंजाबमें छिपा समाजही नहीं, हर एक सिख भगत नामदेवजीको मानता है. उन्होंने जो काम किया है, वह हमारे लिये भगवानसे भी बढकर है’ प्रीतमसिंग बोलत होते. छिपा हे शिंपीचंच पंजाबी रूप. नामदेवांनीही हिंदी पदांत आपल्याला छिपा म्हटलं आहे. आजूबाजूला नजर टाकली की आपण पंजाबमध्ये आहोत की काय असा भास होतो. भिंतीवरील फोटो, बैठक व्यवस्था सगळंच शीख संस्कृतीतलं. त्यात भर म्हणून प्रीतमसिंग यांची पंजाबी लहेजातील हिंदी बोली.

सध्या शीख भाविकांच्या ताब्यात असलेल्या जागेबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगण्यात येतात. नरसीची माहिती कळल्यावर १९९५मध्ये कुलदीपसिंग, त्यांची बहीण दिलीप कौर आणि आणखी एका सदस्यानं या ठिकाणाला भेट दिली. ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, जागेचा मूळ मालक जागा विकण्यास तयारच नव्हता. त्यावेळी याठिकाणी समीर नावाचा एक मुलगा आला. त्याने या तिघांना नामदेवांचा प्रसाद म्हणून एक मोसंबी दिली. तिघांनी मोसंबीचा प्रसाद खाल्ला आणि समीरचा निरोप घेऊन ते पुन्हा पंजाबला गेले. दोन महिन्यांनी ट्रस्टची स्थापना केल्यावर ते पुन्हा नरसीत आले. त्यावेळी त्यांनी समीरची चौकशी केली. ते शाळेत गेले. त्यांनी शिक्षकांना विचारलं. समीर नावाचा दहावीत शिकणारा मुलगा आहे का? त्यावर शिक्षकांनी सांगितलं, की आमच्या शाळेत समीर नावाचा मुलगाच शिकायला नाही. तिघांना आश्चर्य वाटलं. नामदेवांनीच समीर म्हणून या तिघांना दर्शन दिल्याची मान्यता शीख भाविकांमध्ये आहे. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण या कथेमुळे पंजाबी भाविकांत नरसीविषयी भक्तिभाव जागवण्यात मदत झाली असणार हे नक्की.

शिखांना ही जागा ताब्यात घेणं सोपं नव्हतंच. वर्षानुवर्ष अडगळीत पडलेल्या या वास्तूसाठी जागेचा मालक अव्वाच्या सव्वा किमतीची मागणी करीत होता. शिखांना गावात कुणी उभं करत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला मराठी माणसांच्या नावे जमीन खरेदी केली. मग ही जमीन त्या मराठी माणसांनी संतशिरोमणी भगत नामदेवजी गुरूद्वारा ट्रस्टला दान केली. आता ही जमीन कोणाच्याही मालकीची नसून तिला केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या वास्तूभोवती वर्गणीतून एक सातमजली मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे. सध्या याचे दोन मजले तयार झाले आहेत.

नामदेवांचं वडिलोपार्जित घर पाहिल्यावर गावातलं केशवराजाचं मंदिर पाहायचं होतं. नामदेवांच्या अभंगात केशीराज अनेकदा भेटतात. केशीराज आणि विठ्ठल अनेकदा समानार्थानेच येतात. त्यामुळे बालपणी नामदेवांनी विठ्ठलाला दूध पाजल्याची आख्यायिका केशीराजांच्यासंबंधीही आहेच. नामदेवांचं दूध पिणा-या केशवराजाचं मंदिर नामदेवांच्या घराच्या मागच्या गल्लीत आहे. जमिनीच्या खाली एका भुयारात हे देऊळ आहे. तेथे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. मंदिराची पडझड झाली आहे. मंदिराचा कळस पूर्णपणे ढासळला आहे. या ठिकाणी मंदिर आहे, हे कोणी सांगितल्यावरच आपल्या लक्षात येतं. मंदिराच्या समोर एक पुरातन कुंड आहे. या कुंडात पाणी असायचं. आता यात फक्त कचरा आणि घाणच आहे. नरसीमध्ये सध्या शिंपी समाजाची एक-दोनच घरं आहेत. तीही नामदेवांच्या वंशातली नाहीत. नामदेवांचा परिवार वारीनिमित्त पंढरपूराला गेला आणि तेथेच स्थायिक झाला. त्यांनी पुन्हा कधीही हिंगोलीकडे मोर्चा वळविला नाही.

पण आम्ही आमचा मोर्चा औंढा नागनाथकडे वळवला. विडोळकरांनी मला हिंगोलीला सोडलं. तिथे बाळाजी पाठक नावाच्या पत्रकाराशी ओळख झाली. पुढील पडाव औढा नागनाथ असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी आपल्या बाईकनं औंढाला सोडण्याची तयारी दर्शवली. पेट्रोल भरण्यासाठी गाडी पेट्रोलपंपाकडे वळवली. योगायोग म्हणतात तो याला. पंपाचे मालक बांगर यांनी पाठकांना नमस्कार केला. पाठकांना माझी ओळख करून दिली. नामदेवांची माहिती घेण्यासाठी मुंबईहून आल्याचं सांगितलं. बांगर म्हणाले, मोतीराम इंगोले आणि पंकज अग्रवाल यांना भेटायलाच हवं. त्यांनी नामदेवांवर सीडी काढली आहे. औंढा नागनाथला जाणारे आम्ही पुन्हा हिंगोलीला परतलो.

हिंगोलीच्या मध्यमवर्गीय लोकवस्तीत मोतीराम इंगोले यांचं घर होतं. आमचं फोनवर आधी बोलणं झाल्यामुळे पंकज अग्रवालही आले होते. चार वर्षांपूर्वी नांदेड येथील गुरुतागद्दीला ३०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इंगोले आणि अग्रवाल यांनी संत नामदेवांच्या जीवनावर माहितीपट असणारी सीडी काढली होती. डॉक्युमेंट्री बनवायची तांत्रिक माहिती काहीच नव्हती. तरीही या दोन्ही अवलियांनी सीडी काढण्याचं धाडस केलं. यासाठी ते पंजाब, राजस्थान आणि नामदेवांचा प्रभाव असलेल्या ठिकाणी जाऊन आले. मला त्यांनी आपली सीडी दिली. त्याचवेळी आमचा मित्र नीलेश बने माझ्यासारखा नामदेवांची माहिती मिळवण्यासाठी पंजाबमध्ये गेला होता. तिथली माहिती द्यावी म्हणून आम्ही त्याला फोन केला. मी त्याला फोनवर सीडीची माहिती सांगत असतानाच त्यानं तिकडून सांगितलं, मी नुकतीच हीच सीडी विकत घेतली आहे. हा योगायोग फारच विलक्षण होता. त्यानं इंगोले आणि अग्रवाल खूपच भारावून गेले. हे नामदेव महाराजांनीच घडवून आणलंय, असं सांगत ते खूप खूष झाले. विडोळकर यांच्याबरोबर नरसीला गेल्यावर माझा ग्रह थोडा मराठी नामदेव विरुद्ध पंजाबी नामदेव, असा झाला होता. पण इंगोले आणि अग्रवाल सांगत होते ती बाजू वेगळीच होती.

‘नामदेवांना महाराष्ट्रापेक्षा पंजाबमधील लोक अधिक मानतात. शीख भाविकांनी घुमान येथे नामदेवांची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. तसंच घुमानच्या प्रत्येक गाडीवर आणि दुकानावर ‘धन धन बाबा नामदेव’, असं लिहिलेलं असतं. घुमानमधील प्रत्येक व्यापारी आपल्या दुकानात जाण्यापूर्वी १० रुपयांच्या दोन नोटा घेऊन जातो, एक दानपेटीत टाकतो आणि दुसरी नामदेवांचा आशीर्वाद म्हणून दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवतो’, इंगोले आणि अग्रवाल हे सांगताना अत्यंत भारावून गेले होते. गुरूद्वाराला भेट दिल्याशिवाय तुमची नरसीची भेट अपूर्ण असल्याचं इंगोले म्हणाले. उशीर झाला होता. म्हणून हिंगोलीत एक दिवस मुक्काम वाढविला.

आता रात्र मोकळी होती. नामदेवांविषयी बोलण्यासाठी आम्ही सुनील केदारींना भेटलो. हे सरकारी अधिकारी. पण व्यापक विचार. ‘नामदेव हे राष्ट्रसंत आहेत. त्यांना एखाद्या जातीपुरतं सीमित करून ठेवलं तर इतर त्याकडे लक्ष देत नाहीत. नामदेव आमच्या समाजाचे, असं म्हटल्यावर इतर समाज आपला संत शोधतो आणि नामदेवांच्या कार्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे नामदेव सर्वांचे, असं म्हटल्यावर या ठिकाणी सर्वजण हिरीरीने भाग घेतील. नरसीला मोठ्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होईल. त्यानं हिंगोली आणि नरसीचा विकास होईल’, केदारी पोटतिडकीनं सांगत होते. ‘गावात एका मारवाड्यानं हनुमानाचं मंदिर उभारलंय, पण तिकडे कुणी कुत्रंपण फिरकत नाही. पण येथील दर्ग्यावर मुसलमानांपेक्षा हिंदू अधिक जातात, दर्गा हा कोणाच्या मालकीचा नाही, त्यामुळे लोकांची तेथे दररोज गर्दी असते.’

दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा बाळाजी पाठक आले. त्यांच्या बाईकवर बसून नरसीतील गुरूद्वारा गाठला. नरसीपासून दोन किलोमीटरवर असलेला हा गुरुद्वारा खरं तर नरसीहून हिंगोलीला जातानाच दिसला होता. पण विडोळकरांचं गुरूद्वारावाल्यांशी पटत नसल्यानं त्यांनी गाडी थांबवली नव्हती. तिथं पोहोचल्यावर आपण महाराष्ट्रात नसून पंजाबमध्ये असल्यासारखं गेटवरच वाटतं. सुमारे २५ एकरच्या परिसरात असलेला हा गुरूद्वारा डोळ्यात मावत नव्हता. १९९६ पासून या गुरूद्वाराचं बांधकाम सुरू आहे. समाधीमंदिराचा परिसर आणि गुरूद्वारा यातील व्यवस्थापन आणि शिस्त यात जमीन-आसमानाचा फरक होता.

सध्या दहा हजार स्क्वेअर फूटांचा लहान गुरूद्वारा आहे. आता सुमारे एक एकराच्या परिसरात एक नवीन गुरूद्वारा बांधण्याचं काम सुरू आहे. “गुरुद्वाराका काम कभी भी खतम नही होंदा. सेवेकरी पैसा भेजते है, वैसा गुरूद्वारा का काम शुरू रहता है. हमें ना पंजाब सरकार मदद करती हैं, ना महाराष्ट्र सरकार. यह भगत नामदेवजी का महिमा है की यहां पर हम ये गुरूद्वारा बना सके”, गुरूद्वारा कमिटीचे अकाऊंटंट संताप व्यक्त करत होते. “हमे यहां गॅस का सिलेंडर कमर्शियल रेट से मिलता है. हम यहां क्या कमर्शियल काम करते है? सरकारसे एक पैसेकी मदत नही और ऐसे तंग किया जाता है. भगत नामदेवजीको जाके नौसौ साल हो गये, यहां उनके वास्ते कुछ नही किया. भगतजी हमारे पंजाब में पैदा होते तो हम पुरा मंदिर सोनेका बना देते”, अकौंटंटसाहिब खूपच चिडून बोलत होते. त्यांचं काही चुकतही नव्हतं. गेल्या १५ वर्षांत शीख भाविकांनी भरभरून दान केल्यामुळे या पंचवीस एकर जमिनीचं रूपडंच पालटलं आहे. येत्या काही वर्षांत मोठ्या गुरूद्वाराचं काम पूर्ण झाल्यावर जुन्या गुरूद्वारात लंगर सुरू करण्यात येईल. त्यानंतर मागील जमीन ताब्यात घेऊन तिथे गार्डन, भक्तनिवास बनविण्यात येईल, असं गुरूद्वाराचे माहिती अधिकारी सांगत होते.

गुरूद्वाराच्या परिसरात फिरताना एक सत्तरेक वर्षांची व्यक्ती कुतुहलानं आमच्याकडे पाहत होती. आम्ही गुरुद्वारावाले आम्हाला सांगत होते, ते लक्ष देऊन ऐकत होती. आम्ही निघत होतो, तेवढ्यात त्यांनी आम्हाला बोलावलं. दानाराम छिपा. हे रिटायर्ट सिनिअर टीचर. ते राजस्थानचे होते हे त्यांच्या वागण्या-बोलण्या-दिसण्यातून कळतच होतं. भारत-पाकिस्तान सीमेवरील श्रीगंगानगरचे हे रहिवासी. राजस्थानातील शिंपी समाजातील नामदेवांचे भक्त. त्यांनी राजस्थानच्या ओबीसी समाजासाठी आरक्षणाची लढाई लढली होती. नामदेव आणि समाजासाठी आता पुढील आयुष्य वेचायचं, असं त्यांनी ठरवलं होतं. नामदेवप्रेमापोटी त्यांनी तीन ते चार वेळा पंढरपूरला भेट दिली आहे. ते पहिल्यांदाच नरसीला आले होते.

दोन दिवस मराठी नामदेव आणि पंजाबी नामदेव भेटत होतेच. आता राजस्थानी नामदेव कसे आहेत, हे समजून घेण्याची उत्सुकता होती. दानारामजींचं उत्तर सविस्तर होतं. महाराष्ट्रात नामदेव वारकरी वेशातील तर पंजाबात पगडी आणि दाढी असलेले. १९८०मध्ये यासंदर्भात खरंखोटं ठरवण्यासाठी छबिल कमिटी स्थापन झाली होती. गुरू गोविंद सिंगांनी शीखांची खालसा फौज तयार केली ती सोळा-सतराव्या शतकात. धर्मासाठी बलिदान करण्यासाठी तयार असलेल्या पंच प्यारे यांना शीख धर्मात मानाचं स्थान आहे. त्यातील एक सरदार मोकमसिंग शिंपी समाजाचे होते. गुरू गोविंद सिंगांपासून घरातली एक व्यक्ती शीख बनू लागला. त्यांनी पाच ककार बाळगण्याचा नियम होता. त्यात केस वाढवणं होतंच. त्यापूर्वी त्यांना पगडी, दाढी नव्हती. त्यामुळे तेराव्या शतकातल्या नामदेवांनी केस वाढवून पगडी घातली असेल, असं संभवत नाही. पण ‘देश तसा वेश’ याप्रमाणं शीख आपल्याप्रमाणेच नामदेवांना पाहतात. पण मुळात महाराष्ट्रीय वेशभूषा असलेल्या नामदेवांनाच आम्ही मानतो. आम्हा राजस्थानींसाठी ते वारकरी वेशातच कायम राहिले, असं दानाराम सांगत होते. नामदेव महाराजांविषयीच्या नेक आख्यायिकांचं राजस्थानी रूप त्यांच्याकडून ऐकायला मिळत होतं. त्यांचं बोलणं छानच होतं. पण औंढ्या नागनाथला जायचं होतं.

बारा ज्योतिर्लिंगातलं एक औढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातलंच. नामदेवांनी इथलंच देऊळ फिरवलं आणि इथेच त्यांना गुरूबोध झाल्याचं मानलं जातं. नरसीहून पुन्हा हिंगोली आणि तिथून पाऊण तास प्रवासानंतर औंढा. औंढ्याला नागनाथ मंदिराचे व्यवस्थापक नीळकंठ विद्याधर देव भेटले. संत नामदेव गुरू करण्याच्या निमित्तानं औंढ्याला आल्याची नोंद आहे. गोरोबा काकांनी नामदेवांच्या डोक्यावर थापटणं मारून त्यांना कच्चा ठरवणं, मग पांडुरंगाच्या सांगण्यावरून गुरू करण्यासाठी बारशी, अंबाजोगाई असं दर्शन घेत औंढ्याला येणं. तिथे वृद्ध विसोबा खेचरांना पिंडीवर पाय ठेवून बसलेलं बघणं. मग जिथे पाय उचलून ठेवला तिथे पिंडी तयार होणं, विसोबा खेचरांनी गुरुपदेश देणं, ही कथा त्यांनी सविस्तर सांगितली.

दुसरी नामदेवांची कथा मंदिर फिरवल्याची. नागनाथासमोर कीर्तन करणाऱ्या नामदेवांना ब्राह्मणांनी हकलून दिलं. त्यांनी मंदिराच्या मागे कीर्तन सुरू केलं. त्यावेळी परमेश्वरानं पूर्व दिशेला तोंड असलेलं मंदिर पश्चिम दिशेला फिरवलं. दोन्ही आख्यायिकांवर नामदेवांच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास केलेला आहे. काही अभंगांतून गुरुपरंपरेला ठोकणारे नामदेव गुरू कसे करतील इथपासून शैव-वैष्णव ऐक्याच्या कथा म्हणून याकडे बघितलं गेलं आहे. रा. चिं. ढेरे आणि अशोक कामत या मान्यवर संशोधकांनी गोरोबाकाका म्हणजे गोरखनाथ असल्याची मांडणी केली आहे. तसंच पाशुपत पंथाच्या प्रथेनुसार नागनाथाचं देऊळ पश्चिममुखी असल्यास नवल नाही, असंही दाखवून दिलंय. पण देवांना हा पाशुपत प्रथेचा दाखला मान्य नाही. कोणत्याही मंदिरात पाण्याचं कुंड हे प्रवेशद्वाराजवळ असतं. येथे ते मंदिराच्या मागील भागात आहे. तसंच नगारखाना हा प्रवेशद्वारावर असतो, मंदिरात नगारखाना मागील बाजूस आहे. त्यामुळे मंदिर फिरलं असावं, अशी भाविकांची श्रद्धा कायम आहे.

पाण्याचे कुंड आणि नगारखाना हा मागील बाजूला असला तरी शंकराच्या मंदिरासमोर असलेला नंदी मात्र समोरच्या बाजूला आहे. आपण मंदिर फिरलं, असं मानल्यास म्हणजे मंदिराबरोबर नंदीही फिरला असेल, हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येतं. नंदीच्या मागे साधारण पन्नास फुटांवर नामदेव महाराजांचं मंदिर आहे. मंदिरात कीर्तन करीत असलेल्या नामदेवांची रंगवलेली मूर्ती आहे. नामदेवांच्या मूर्तीमागेच एक लहानसा चबुतरा आहे, त्यावर विठ्ठल-रखूमाई कर कटेवरी ठेवून उभे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस पश्चिम दरवाजा आहे. सध्या तो बंद आहे. औंढ्यामध्ये मराठी भाविक नागनाथाचं दर्शन करण्यासाठी येतात. पण शीख भाविक भगत नामदेवांचा प्रताप पाहण्यासाठी येतात. त्यामुळे शीख भाविक नरसीइतकीच गर्दी औंढ्याला करतात. त्यांनी मंदिर परिसरात बांधकामही करून दिलेलं दिसतं. मात्र गावकऱ्यांनी साथ न दिल्यानं ते बांधकाम अर्धवटच राहिलं आहे.

नागनाथ मंदिरापासून जवळच विसोबा खेचर यांचं मंदिर आहे. नामदेवांच्या गुरुपदेशाची कथा तिथे मूर्तीच्या रूपात आहे. आपल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिराची स्थिती असते, तशीच या मंदिराचीही दुर्दशा आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या तुरळक आहे. त्यामुळे फारसं कुणाचं लक्ष नाही. अस्वच्छता खूपच आहे. हे देऊळ आता नागनाथाचं दर्शन करण्यासाठी आलेल्यांना विसाव्याची जागा बनलंय. बहुदा विसोबांच्या नावातला विसावा लोकांना आवडला असावा.

औंढ्यातच इतिहासाचे प्राध्यापक मकरंद बांगर यांची भेट झाली. नरसीमध्ये गावात शिरण्यापूर्वी दोन किलोमीटर गुरूद्वारा आहे. त्यामुळे अनेक भाविक नामदेवांच्या समाधीमंदिर किंवा मूळ घरी न जाता गुरूद्वारामधूनच माघारी परतात. नामदेवांचं मूळ घर हे नामदेव महाराज मंदिर समितीला ताब्यात हवं होतं. पण शिखांनी ते चौपट पैसे देऊन आपल्या ताब्यात करून घेतलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मराठी टच काहीच दिसत नाही. आपण नामदेवांच्या घरी नाही तर पंजाबमधील कोण्या संताच्या घरी असल्याची भावना होते. सर्वात महत्त्वाचं, नामदेव हे माझे किंवा तुझे असं न मानता राष्ट्रीय संत म्हणून मानल्यास त्यांच्या शिकवणीचा फायदा सर्वांना होईल. त्यामुळेच नरसी हे तीर्थक्षेत्र म्हणून नव्यानं उदयास येईल, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.

आता पुन्हा परभणीकडे जाणं भाग होतं. परभणीत शिंपी समाजातील काही मंडळी भेटली. शहरात शिंपी समाजाची साधारण १५० घरे आहेत. यांची आडनावे बहुतांशी वैदर्भीय धाटणीची आहेत. विदर्भासारखं इथेही ‘कर’च्या ऐवजी ‘वार’ लावतात. उदा. गटलेवार, पेंडलवार, रापतवार, संगेवार. नरसीला जाण्यासाठी परभणीहून जाणंच सोयीचं आहे. त्यामुळे बहुसंख्य तीर्थयात्री परभणीला येतातत. त्यामुळे परभणीतही नामदेव महाराजांचं मोठं मंदिर बांधण्याचा मनोदय असल्याचं या मंडळींनी सांगितलं. या माध्यमातून पर्यटनालाही वाव मिळेल आणि समाजातील एक-दोन जणांना रोजगार मिळेल, असं त्यांनी बोलून दाखवलं.

परभणीहून पुन्हा देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. शेजारी जनाबाईंच्या गावचे म्हणजे गंगाखेडचे डॉ. सिद्धेश्वर होते. त्यांच्याशी बोलणं सुरू होतं. नरसी आणि नामदेवांचा उल्लेख झाला आणि समोरच्या बर्थवर बसलेल्या व्यक्तीचे डोळे चमकले. त्यांचं नाव होतं श्रीनिवास संगा. तेही आमच्या गप्पांत सहभागी झाले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मीही नामदेव शिंपी पण तेलुगू नामदेव शिंपी. पण तीन-चार पिढ्या मुंबईत असल्यामुळे ते मराठी उत्तम बोलत होते. ते सांगत होते, आम्ही सारे शिंपीच. पण भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे त्या-त्या भाषेनुसार नावं बदलली. पूर्वी आंध्रप्रदेशात शिंपीं समाजाला छिप्पा म्हणून ओळखले जायचे. आता मेरू म्हणून ओळखलं जातं. काही लोकं स्वतःची जात मेरा म्हणूनही लिहितात. तर काही मेरलू पण म्हणतात. शिंपी समाजातील व्यक्तींनी आंध्रप्रदेशात आडनावापुढे ‘वार’ लावले आहे. पण त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात आल्यावर आपलं नाव ‘कर’ करून घेतलं आहे. शिंपी हा शब्द शिंपल्यांवरून आला. आमचे महाराज नामदेव यांचा जन्म शिंपल्यातून झाल्याचं आमच्या पूर्वजांनी सांगितलंय. हे खरं की खोटं कोण जाणे. पण त्यामुळेच शिंपल्यावरून शिंपी झालं असावं, असं म्हटलं जातं. आपल्या गुरूमहाराजांचा जन्म शिंपल्यातून झाल्यानं आम्ही शिंपले खात नाही. मुंबईत कामाठीपुरा येथे आमच्या समाजाचं मोठं मंदिर आहे. अखिल भारतीय शिंपी मेरू समाज अशी आमची मुंबईत ओळख आहे. लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात मेरू समाजाची दुकानं आहेत. संगा सांगत होते.

दादर आलं. संगा उतरले. मी त्यांना खिडकीतून निरोप देत होतो. दोन दिवसांत भेटलेले नामदेव डोळ्यासमोरून पुढे जात होते. संगांचे तेलुगू नामदेव. दानाराम छिपांचे राजस्थानी नामदेव. गुरुद्वा-यातले पंजाबी नामदेव. विडोळकरांचे मराठी नामदेव. नामदेव एकच, पण मला दोन दिवस वेगवेगळी रूपं घेऊन भेटत होते. त्यांच्या जन्मगावीच त्यांनी मला विश्वरूपदर्शन दिलं होतं. एका वैश्विक संताचं विश्वरूपदर्शन. मी आजच्या ग्लोबल खेड्याचा रहिवासीही आठशे वर्षांपूर्वीच्या या ग्लोबल संतासमोर नम्र होतो.

(विशेष सहाय्य : कन्हैय्यालाल खंडेलवाल, हिंगोली आणि पंकज क्षीरसागर, परभणी)

0 Shares
अरूपाचे रूप नामयाची पंढरी