जोतिबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास

हरी नरके

संत सावता माळी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्यात एक आंतरिक नातं आहे. तेच नातं वारकरी आणि सत्यशोधक विचारांमधेही आहे. आजच्या काळात ते समजून घेणं अधिकच महत्त्वाचं बनलंय.

महाराष्ट्राच्या मध्ययुगीन जडणघडणीत संतांच्या योगदानाचा तर आधुनिक जडणघडणीत समाजसुधारकांच्या योगदानाचा सर्वाधिक वाटा आहे. वारकरी चळवळ ही महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेली चळवळ आहे. आज देशातल्या ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राची स्वत:ची ठसठशीत अशी नाममुद्रा आहे आणि तिची निर्मिती करण्यात वारकरी चळवळ अग्रभागी राहिलेली आहे.

मराठा सत्तेच्या निर्मितीमागे सावता-नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकोबा यांच्या विचारांचा अभेद्य किल्ला होता, हे न्या. म. गो. रानडे यांनी आपल्या ‘राईज ऑफ मराठा पॉवर’ या ग्रंथात सप्रमाण मांडलेलं आहे. संत साहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती प्रा. गं. बा. सरदार यांनी आपल्या दोन ग्रंथांमध्ये विशद केलेली आहे.

‘संत सावता दर्शन’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘अवघियापुरते वोसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे’ अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर ज्ञानदेव-नामदेवांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रात भागवत धर्माची – वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचं कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचं होतं. तरीदेखील त्यांच्या तत्त्वनिरूपणात आणि भक्तिपर वाङ्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे. किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळंच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभलेली आहे. या मध्ययुगीन संत मंडळाच्या काळात धर्म हाच कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. म्हणून ज्यांना ज्यांना सामाजिक जीवनातील जडत्व आणि अपप्रवृत्ती नष्ट करून त्याला नवं वळण देण्याची आवश्यकता वाटली, त्यांनी त्यांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी धार्मिक प्रबोधनाची कास धरली. मराठी संत मंडळाच्या कार्याचं मूल्यमापन करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे.’

सावता महाराजांचे अवघे ३७ अभंग आज उपलब्ध असले तरी केवळ संख्या न बघता त्यांची वाङ्मयीनमहत्ता लक्षात घेणं गरजेचं ठरतं. ज्या सोप्या, सहज, प्रवाही भाषेत त्यांनी लिहिले ते बघता ही भाषा आजची वाटते. साडेसातशे वर्षांपूर्वीची भाषा आजची वाटावी ही फार मोठी बाब आहे. पुढच्या काळात तुकोबा म्हणाले होते, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।’ अशा शब्दात व्यक्त होत निसर्गाशी एकरूप होणारे तुकोबा हे सावतामहाराजांचे पुढच्या काळातले महत्त्वाचे वारस ठरतात.

‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी’, या शब्दात त्यांनी हिरवेगार शेत साहित्यात आणि समाजजीवनात अजरामर करून टाकलं. निसर्गाशी जगण्याचं असं अविभाज्य नातं निर्माण करणारे सावता महाराज त्यामुळंच आजचे कवी ठरतात. त्यांची ही हिरवीकंच संवेदना आजची संवेदना बनते.

शेतात राबणारे आणि निर्मितीचे डोहाळे लागलेले त्यांचे हात मातीशी दोस्ती करणारे हात आहेत. ‘स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात’ या पद्धतीनं आपलं काम हेच आपल्या मुक्तीचं, आनंदाचं, मोक्षाचं साधन आहे, हा त्यांनी मांडलेला विचार तर अगदी आधुनिक विचार आहे. पाश्चात्य जगात काल परवा सांगितला गेलेला ‘वर्क इज वर्शिप’ हा विचार सावता महाराजांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी मांडावा यातनं त्यांचं द्रष्टेपण आणि काळाच्या पुढं असण्याचा जीवनहेतू स्पष्ट होतो.

मध्ययुगीन भारतात जातीयतेची बजबजपुरी माजलेली होती. अशा काळात बलुतेदार-अलुतेदार, कारू नारू समाजातून आलेल्या संतांना त्याचा काच सोसावा लागत होता. ती वेदना त्यांच्या शब्दातून प्रगट ना होती तरच नवल. ‘माझी हिन याती’, ‘भली केली हीन याती’, ‘सावता म्हणे हीन याती’ या शब्दांमधून ही जातीपातीची समाजव्यवस्था ते टिपतात. मात्र ते सतत तक्रार करत बसत नाहीत. ‘आमुचि माळीयाची जात, शेत लावू बागाईत’, अशा सकारात्मक पद्धतीनं प्राप्त परिस्थितीतही ते आनंद शोधतात. ‘झणी उतरा निंबलोण’, ‘प्रेमे वनमाळी चित्ते धरू’, ‘उगाच वणवा लागे देही’, अशा शुद्ध मराठमोळ्या रचना हे त्यांचं वैशिष्ट्य. ‘नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची’, या भूमिकेतून त्यांनी काळाच्या मर्यादा पडलेल्या असतानाही इथल्या उच्चवर्णीय दांभिकतेवर कोरडे ओढलेले दिसतात.

तुकोबांच्या रचनांवर सावता महाराजांच्या शब्दकळेचा प्रभाव पडलेला असावा. ‘कळीकाळाच्या माथा सोटे मारू’, ही सावतोबांची रचना आणि ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ ही तुकोबांची रचना समोरासमोरा ठेवून बघावी किंवा ‘बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मोकलिलो’ हे तुकोबांचे प्रांजळ उद्गार आणि जरी असता ‘ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म’ हा सावतोबांचा कबुलीजबाब एकत्रित पाहावा.

सावतोबा, नामदेव, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, जोगा परमानंद, जगमित्र नागा, बंका महार, चोखा मेळा, कर्ममेळा, जनाबाई, अशा विविध कष्टकरी आणि निर्माणकर्त्या समाजातून आलेल्या संतांनी फुलवलेले सर्जनाचे मळे बघितले की ही मराठमोळी माती श्रीमंत कशी आणि का झाली, याचा उलगडा होतो. ज्ञानदेव जरी ब्राह्मण असले तरी ते बहिष्कृत होते आणि एकनाथसुद्धा ‘संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली?’, असा रोकडा प्रश्न विचारून प्रस्थापितांना आव्हान देणारेच होते.

सामान्य माणसाचं जगणं श्रीमंत व्हावं, समृद्ध व्हावं, समाधानी व्हावं यासाठी चाललेली ही धडपड होती. ती पाहिली की अठराव्या-एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले, सत्यशोधक चळवळ, न्यायमूर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, सर रा. गो. भांडारकर, प्रार्थना समाज, लोकहितवादी, आगरकर, कर्वे आणि पुढं गांधी, विनोबा, साने गुरूजी यांची वाटचाल नेमकी कोणत्या प्रकाशात होत होती त्याचा उलगडा करता येतो.

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना नेमकी कोणती प्रेरणा त्यामागे होती. याचा दस्तऐवज म्हणजे ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ हा ग्रंथ होय. तुकाराम हनमंत पिंजण या अभ्यासकाचे याबद्दलचे टिपण अतिशय मौलिक आहे. ते म्हणतात, ‘त्याकाळात महात्मा जोतीराव फुले आणि त्यांचे सगळे सहकारी संत कबीर यांच्या बीजक या ग्रंथाचं जाहीर वाचन करत आणि त्यावर चर्चा, चिंतन-मंथन होत असे. महान बौद्ध दार्शनिक अश्वघोष यांनी लिहिलेल्या ‘वज्रसूची’ या ग्रंथावरचा सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांचा ‘जातीभेदविवेकसार’ हा ग्रंथ १८६५ साली जोतीरावांनी प्रकाशित केलेला होता. तुकोबांच्या साहित्यानं तर जोतीराव भारावलेलेच होते.

अशा परिस्थितीत जोतीरावांच्या सत्यशोधक समाज निर्मितीमागे संत चळवळीच्या योगदानाचा अतिशय गडद प्रभाव असणं स्वाभाविक होतं. सत्यशोधक समाजातले सगळे प्रमुख सहकारी हे वारकरी कुटुंबातून आलेले होते. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या काही वर्षांचे अहवाल आपण नजरेखालून घातले तर आपल्याला कळेल की त्यातले ९० टक्क्यांहून अधिक साथीदार हे वारकरी होते.

निष्ठावंत वारकरी घरांमधल्या जोतीरावांच्या सहका-यांची नावं पाहिलं तर वारकरी आणि सत्यशोधक याच्यातला ऋणानुबंध लक्षात येऊ शकेल. शेतकरी कष्टकरी चळवळीचे नेते, प्रख्यात लेखक, ‘दीनबंधू’चे संस्थापक संपादक कृष्णराव पांडुंरंग भालेकर. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे. व्हॉईसरॉयचे वैद्यकीय सल्लागार, प्रख्यात विचारवंत, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले. सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या सहकार चळवळीचे जनक आणि जोतीराव फुले यांचे व्याही ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे. प्रख्यात विचारवंत, लेखक, पत्रकार हरिश्चंद्र नारायण नवलकर. जोतिबांचे पहिले चरित्रकार आणि पहिले दलित पत्रकार शिवराम जानबा कांबळे. छत्रपती शिवराय, संत तुकाराम, गौतम बुद्ध अशा ४० चरित्रांचे लेखक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सयाजीराव गायकवाडांशी गाठ घालून देण्याचं ऐतिहासिक काम करणारे कृष्णराव अर्जुन केळुस्कर. एसएससी परीक्षेत मुंबई प्रांतात पहिले आलेले छत्रपती शाहू महाराजांचे दिवाण, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष भास्करराव जाधव. मुंबईतल्या तेलगु समाजाचे नेते, लेखक, कंत्राटदार आणि पहिल्या सत्यशोधक परिषदेचे आयोजक आणि अध्यक्ष व्यंकय्या रामय्या अय्यावारू. निष्ठावंत वारकरी घरांमधून आलेल्या जोतीरावांच्या सहका-यांमधली ही फक्त ठळक नावं आहेत. अशी आणखी बरीच नावं काढता येतील. यात गवळी, मराठा, कुणबी, माळी, सोनार अशा वेगवेगळ्या समाजातली ही मंडळी होती. सत्यशोधक चळवळ ही सुद्धा वारकरी चवळीसारखी बहुमुखी होती, हेही यातून लक्षात येतं.

यातलं एक खूपच महत्त्वाचं नाव म्हणजे तुकाराम हनुमंत पिंजण. २४ सप्टेंबर १८७३ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, तेव्हा हे सर्वात तरुण सदस्य होते. तेव्हापासून ते शेवटपर्यंत ते फुल्यांच्या सोबत होते. विशेष म्हणजे ते संत तुकारामांच्या वंशजांचे भाचे; म्हणजे त्यांची आई ही मोरे घराण्यातली. त्यांचे सासरे देवराव ठोसर यांच्या घरात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या लिखाणामुळं वारकरी विचारांशी असलेला सत्यशोधक समाजाचं नातं अधिक स्पष्ट झालंय.

पिंजण यांनी असंही नोंदवलंय की जोतीराव आळंदी आणि देहूला नियमित जात असत, आळंदीच्या वाटेवर एका वृद्ध वारक-यांनं उद्गार काढले होते, की ‘जोतिबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास’. त्याचा प्रसंग ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’मध्ये आलेला आहे. तो असा, एकदा आळंदीचे वारीस आम्ही काही मंडळी जात होतो. महात्मा जोतीराव फुले यांच्या व्याख्यानासाठी मारूतराव नवले, भाऊ पाटील डुंबरे, बिरमल आणि मी असे चौघेजण आम्ही महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत चाललो होतो. थोड्या अंतरावर म्हणजे दिघी गावच्या पुढं आम्ही बोलत बोलत चाललो होतो. इतक्यात एक म्हातारा साधू वारकरी आळंदीहून परत येत होता. म्हातारा पुण्याकडे चालला होता. दुपारची वेळ होती. अतिशय भूक आणि तहान लागल्यामुळं तो धापा टाकीत चालला होता. कसं तरी दिघीस जावे असा त्याचा विचार होता. पण चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. तो पडला हे पाहून आम्ही सारे पळत त्याच्या जवळ गेलो. आमच्या सोबतचे एक वारकरी हसून त्याला म्हणाले, ‘वारकरीबुवा, तुम्ही आता म्हातारे झालात. आता वारी कशाला करता? जा वैकुंठाला.’तो गृहस्थ त्या म्हाता-याची चेष्टा करीत होता. म्हातारा तर बेशुद्ध पडलेला होता. तो बिचारा काय बोलणार? महात्माजीस त्याची दया आली. त्यांनी त्याला मांडीवर घेतले. आम्हाला पाणी आणायला पिटाळले. नवले आणि मी पळत गेलो. दूर एक विहीर दिसली. तेथे गेलो. विहिरीवर आणि आमच्याजवळही पाणी काढायला भांडे नव्हते. नवल्यांच्या पागोटीला माझे उपरणे बांधून ते विहीरीत सोडले. व ते पाण्यात भिजवून पळत घेऊन गेलो. ते पिळून थोडे पाणी म्हाता-याच्या तोंडावर शिंपडून थोडे त्याला पाजले. थोड्या वेळानं म्हातारा शुद्धीवर आला. महात्माजींनी त्याला शिदोरीतून थोडी भाकरी काढून दिली. म्हातारा गहिवरला. महात्माजीस म्हणाला, ‘बाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास.’म्हातारा महात्माजींच्या पाया पडू लागला. महात्माजी म्हणाले, ‘वारकरी बाबा, मी जी तुमची अल्प सेवा केली ती तुमच्यासाठी केली नसून, उद्या मलाही तुमच्यासारखे म्हातारे व्हायचे आहे, तेव्हा ती मी माझ्याचसाठी केली आहे.’ बरोबरचे गृहस्थ आणि इतर जमलेले वारकरी महात्माजींची स्तुती करीत निघून गेले. ‘आम्ही म्हाता-याला रस्त्यानं लावून दिलं आणि आपल्या उद्योगाला पुढं निघून गेलो.’हा अनुभव आहे सत्यशोधक तात्यासाहेब धोंडिबा रोडे यांचा. ते महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी आणि सहकारी होते. त्यांचा मूळ लेख आपण ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ या महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेल्या ग्रंथात वाचू शकाल.

जोतीराव नियमितपणे आळंदी आणि देहूला जात असत. त्याच्या अनेक आठवणी या ग्रंथात आलेल्या आहेत. जोतीरावांनी रूढी, परंपरा, जातिव्यवस्था, लिंगभाव यांच्यावर कठोरपणे आसूड ओढले. त्यांची समाज क्रांतीची भाषा बघून अनेकांचा असा समज होतो की ते वारकरी चळवळीच्या वा-यालाही उभं राहत नसतील. प्रत्यक्षात जोतीराव आणि अनेक सत्यशोधक यांच्या वैचारिक जडणघडणीवर संत साहित्याचा, विशेषत: सावतोबा, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकोबा यांच्या विचारांची अमीट छाप होती. ‘जोती म्हणे’ या नाममुद्रेनं जोतीरावांनी लिहिलेले क्रांतिकारक अखंड = अभंग, हे तर या परंपरेचा सामाजिक – वैचारिक वारसा पुढं नेणारं फार महत्त्वाचं विचारधन आहे.

महात्मा फुले आपल्या लिखाणात संत सावता माळी यांचा कुठंही उल्लेख करत नाहीत. पण त्यांच्यात एक वैचारिक पण आंतरिक नातं आहे. फुले ‘निर्मिक’ ही संकल्पना मानतात. संत चळवळीचा विठ्ठल, तसा फुल्यांचा निर्मिक. अर्थातच निर्मिकवर क्रिएटरची छाया आहे; म्हणजे विश्वाची निर्मिती करणारी शक्ती. या निर्मिकाची पूजा कशी करायची हे त्यांनी लिहिलंय,

अज्ञानाशी ज्ञान । पांगळ्या अन्नदान । हेच बा स्मरण निर्मिकाचे ।

अडाणी माणसाला शिक्षण देणं आणि अपंग माणसाला अन्नदान देणं म्हणजे ईश्वरपूजा. या पार्श्वभूमीवर सावता महाराजांची शेती आणि प्रपंच यात विठ्ठल बघण्याची वृत्ती; यामध्ये एक थेट नातं दिसतं. दोघंही वेगवेगळ्या काळाचे प्रतिनिधी आहेत. सातशे वर्षापूर्वींचे असल्यामुळं संत सावता महाराजांना काळाच्या मर्यादा असणारच. फुल्यांनी थॉमस पेन वाचलेला असणं, मिशन-यांचं वाचलेलं असणं, त्यांना आधुनिक विचार विश्व उपलब्ध असणं, हा फरक असणारच. तरीसुद्धा दोघांमधे एक आंतरिक नातं आहे. ती म्हणजे म्हणजे रूढ संकल्पनेनुसार मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्याच्या मार्गानं न जाता दोघंही वेगळं काहीतरी म्हणतायंत. हे ते नातं आहे.

दुसरं म्हणजे फुल्यांच्या सगळ्या कवितांमध्ये निसर्ग पुन्हा पुन्हा येतो. झाडे येतात; शेती येते. त्यांचा ‘शेतक-यांचा असूड’ तर खूपच प्रसिद्ध आहे. विठोजी भुजबळ नावाच्या एका मांत्रिकानं सत्यशोधक लग्नाला विरोध केला, तेव्हा त्याबाबत लिहिताना फुले म्हणाले की, ‘तू स्वत:ला माळी जातीचा म्हणवतोस आणि माणूस नावाचे फूल तू चुरगाळून टाकतोस. याची तुला लाज कशी वाटत नाही’. एकीकडे सावतोबांनी कांदा, मुळा, भाजी यामध्ये ईश्वर बघणं आणि इथं फुल्यांनी फुलाला माणसाचं प्रतीक मानणं हे एकच आहे. ‘शेतक-यांचा असूड’ लिहिणारे फुले आणि ‘कांदा, मुळा, भाजी’ लिहिणारे सावतोबा, ही एक परंपरा आहे.

महात्मा फुल्यांची अत्यंत बंडखोर आणि क्रांतिकारक विचारधारा मांडलीय. पण सावतोबांचे मर्यादेत का होईना बंड आहेच, हे आपण समजून घ्यायला हवं. आपण ब्राह्मण नाही, हे बरे आहे, असं म्हणणं हेदेखील बंडच आहे. अर्थात ते फुले किंवा आंबेडकर यांच्या पद्धतीचं बंड नाहीय. दोन्ही बंडं एकच आहेत, अशी गल्लत करण्याची गरज नाही. कारण काळानुसार त्याचं स्वरूप बदललंय. परिभाषा बदललीय. पण त्यातलं बीज समान आहे.

गं. बा. सरदार अतिशय प्रख्यात मार्क्सवादी होते. आता आपण मार्क्सवाद्याला वारकरी म्हणू शकत नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीनं संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती मांडली, फुले उलगडून दाखवले आणि संपूर्ण परंपरा उकलून दाखवली; ती पाहिली की लक्षात येतं, की हेच डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, रा. ना. चव्हाण करत होते. या अशा सर्व विचारवंतांमधलं मूळ बीज वारकरी होतं. त्यांनी त्यातली मराठमोठी संवेदना कायम ठेवून त्याचा विकास केला आणि ते वैश्विक उंचीवर नेलं. अर्थातच फुले आणि आंबेडकरही त्याला अपवाद नव्हते.

उलट प्रश्न असा विचारता येईल की, शिवाजी महाराष्ट्राच्या बाहेर का नाही झाले? फुले-आंबेडकर महाराष्ट्राबाहेर का नाही झाले? तर त्याचं कारण संत चळवळ इथं होती. हे न्यायमूर्ती रानड्यांनी मांडलंय आणि सरदारांनीही. ते महत्त्वाचं आहे. ते समजून घेतलं की संत सावता माळी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्यातला, वारकरी आणि सत्यशोधक चळवळीतला शाश्वत अनुबंध लक्षात येऊ शकतो.

0 Shares
ज्ञानकर्माच्या मार्गाने जातभेदाच्या पलीकडे उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवणारी भक्तिपरंपरा